जिल्हा पालकमंत्री-साखरमंत्री शिवराम हेब्बार यांचे प्रतिपादन : रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयावर महाद्वार उभारणीच्या कामाला चालना
प्रतिनिधी / कारवार
नवीन पर्यटन धोरणामुळे जिल्हय़ातील पर्यटन व्यवसायाला अधिक बळ मिळणार आहे. भविष्यात पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत कारवार जिल्हा संपूर्ण राज्यात आदर्शमय बनून राहणार आहे, असा विश्वास जिल्हा पालकमंत्री व कामगार आणि साखरमंत्री शिवराम हेब्बार यांनी व्यक्त केला. ते येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयावर महाद्वार उभारणी आणि अन्य कार्यांना चालना देऊन बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.
हेब्बार पुढे म्हणाले, कारवार जिल्हा औद्योगिकदृष्टय़ा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. वेगवेगळय़ा कारणामुळे येथे औद्योगिक विकासाला चालना देणे शक्य होईनासे झाले आहे. जिल्हय़ात पर्यटनस्थळांची रेलचेल असल्याने पर्यटन व्यवसाचा मोठय़ा प्रमाणात विकास घडवून आणणे शक्य आहे. तथापि गेल्या सात-आठ महिन्यात कोविडच्या फैलावामुळे येथे पर्यटन व्यवसायाची मोठी हानी होऊन पिछेहाट झाली आहे. मात्र आता पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी विशेष रस दाखवून नवीन पर्यटन धोरण जारी केले आहे. नवीन पर्यटन धोरणामुळे कारवार जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात पर्यटन व्यवसायाचा विकास घडवून आणणे शक्य आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, महान कवी रविंद्रनाथ टागोर यांचे पाय कारवारच्या समुद्र किनाऱयाला लागले आहेत. त्यामुळे येथील समुद्र किनाऱयाचे नामकरण रविंद्रनाथ टागोर, असे करण्यात आले आहे.
यावेळी कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक, नगराध्यक्ष डॉ. नितीन पीकळे, उपाध्यक्ष प्रकाश पी. नाईक,
जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के., जि. पं. मुख्य कार्यदर्शी एम. रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रकाश देवराजू, कारवारच्या असिस्टंट कमिशनर प्रीयांगा एम. आदी उपस्थित होते.
लढाऊ विमान संग्रहालय होणार…
मंत्री हेब्बार म्हणाले, येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयावर यापूर्वीच ‘चपळ युद्धनौका संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. आता रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयाकडे पर्यटकांना खेचून आणण्यासाठी ‘टोफेलो लढाऊ विमान संग्रहालय’ उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. लढाऊ विमान रविंद्रनाथ समुद्र किनाऱयावर आणल्याची जबाबदारी भारतीय नौसेनेने उचलली आहे. कोविड-19 मुळे अखंड लढाऊ विमान येथे आणणे शक्य नाही. आणि म्हणून विमानाचे वेगवेगळे भाग येथे आणून त्याची येथे जोडणी करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय नौसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किनाऱयावरील लढाऊ विमान संग्रहालयाचे स्वप्न ही साकार होणार आहे, असे पुढे हेब्बार यांनी सांगितले.