स्मार्ट सिटी अधिकारी-प्रशासनाचे परिसराकडे दुर्लक्ष :प्रशासनाच्या नावाने शिमगा
प्रतिनिधी / बेळगाव
माणसांचे जसे नशीब असते तसे रस्त्याचेही असावे. कारण काही काही रस्त्यांच्या नशिबी सुधारणा हा शब्द कोसो मैल दूर असतो. मंडोळी रोडवरील दत्त मंदिरापासून गुरुप्रसाद कॉलनी-चन्नम्मानगर या रस्त्याची इतकी दुरवस्था झाली आहे की तेथून ये-जा करताना नागरिकांच्या उरात धडकी भरत आहे. मात्र स्मार्ट सिटी अधिकारी आणि प्रशासनाचे या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
या परिसरात येणारे-जाणारे वाहन चालक विशेषतः टेम्पो आणि रिक्षा चालक प्रशासनाच्या नावाने शिमगा करत आहेत. दत्त मंदिरापासून जी रस्त्याची दुरवस्था सुरू होते ती पार नरगुंदकर कॉलनी-चन्नम्मानगरपर्यंत तशीच आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था असून प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याची टीका नागरिक करत आहेत.
मुख्यतः दोन कि. मी. रस्तासुद्धा खड्डेमुक्त आहे असा नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहने येत असतील तर एक वाहन खड्डय़ात रुतून वाहनांचे अपघात होत आहेत. येथील सर्व नागरिक कर भरत असून सुद्धा प्रशासन या रस्त्याच्या कामाकडे का दुर्लक्ष करत आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.