मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती, विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद, दहावी, बारावी वर्गांबाबत अनिश्चिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील शाळा, कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अजून काही निश्चित झालेले नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांवर ते अवलंबून आहे. तथापि, पुढील महिन्यांपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात नवीन शैक्षणिक धोरण पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असून त्यासाठी सरकारने जलद कृती समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
काल शुक्रवारी राज्यातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्रीय गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांवर शाळा, कॉलेज सुरू होण्याचे भवितव्य ठरणार आहे. सामाजिक अंतर ठेऊन पुढील महिन्यात शाळा, कॉलेज सुरू होऊ शकते. शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा प्रयत्न असून प्रथम दहावी, बारावीचे वर्ग आणि नंतर इतर इयत्तेचे वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण व नोकरीची सांगड
या संवादावेळी प्रथम मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण व नोकरीची सांगड घालण्यात आली असून ती आठव्या इयत्तेपासून सुरू होणार आहे. यापूर्वी हा समन्वय बारावी परीक्षेनंतर होता. तथापि, आता नव्या धोरणात तो आठवीपासून सुरू केला जाणार आहे.
वर्षभरात गोव्यात इंटरनेट सुधारणार
ऑन लाईन शिक्षणासाठी अनेक अडथळे येत असून ते दूर करावेत म्हणून सरकारने गोवा दूरसंचार धोरण 2020 तयार केले आहे. या धोरणाला मान्यता देण्यात आली असून येत्या वर्षाभरात गोव्यातील इंटरनेटची सुविधा सुधारेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देणार
स्पर्धात्मक परीक्षांसाठी राज्यातील मुलांना तयार करण्यासाठी विविध ठिकाणी असलेल्या सहा सरकारी कॉलेजमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी चांगले प्रशिक्षण मिळेल. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय, उद्योग सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीनंतर आपली आवड लक्षात घेऊन त्यानुसार पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी. दहावी, बारावीत नापास झाले तरी इतर अनेक कोर्स, अभ्यासक्रम करून आपला मार्ग निवडता येतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.