सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जनतेने आणि देशविदेशातून आलेल्या लाखो पर्यटकांनी मध्यरात्री जल्लोषात, नृत्य-गाण्यांच्या माध्यमातून जोरदार स्वागत केले. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मावळत्या दिनकराचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील समुद्रकिनारे माणसांनी फुलून गेले होते. मध्यरात्री राज्यातील सर्व चर्चच्या घंटा 11 वाजून 58 मिनिटांनंतर वाजू लागल्या. घंटांच्या नादात चर्चमधील फादर्सनी नववर्षाची घोषणा केली. राज्यतील चर्चमध्ये प्रार्थना करण्यास गेलेल्या ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांस शुभेच्छा दिल्या.
राज्यात आलेल्या लाखो पर्यटकांनीदेखील विविध पर्यटनस्थळी मध्यरात्री 11.59 वाजता कार्यक्रमांतील दिवे बंद केले व 12 वाजता दिवे पुन्हा लागले. फटाक्यांची आतषबाजी झाली आणि नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
नववर्षात मुख्यमंत्र्यांचे पाच नवसंकल्प
सरकारी आणि खाजगी पातळीवर रोजगार, हरित उद्योगातून राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक, पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन, पर्यटन उद्योगाला झळाळी आणि नव्याने खाणउद्योग सुरू करणे असे पाच नवे संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्ष 2020 साठी सोडले आहेत.
जनता पाठीशी राहणार : मुख्यमंत्री
नवे इंग्रजी वर्ष सुरू होत असून त्यानिमित्ताने काल पूर्वसंध्येला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दै. तरुण भारतशी बोलताना नव्या वर्षात पुष्कळ कार्ये करायची आहेत, असे सांगितले. गेल्या वर्षात जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. नव्या वर्षातदेखील जनता सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे ते म्हणाले. आपण स्वतः या राज्यासाठी पाच संकल्प सोडलेले आहेत. त्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला फार परिश्रम करावे लागणार आहेत. परंतु तशी तयारी ठेवलेली आहे.
बेकारी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार
वाढती बेरोजगारी हा सर्वांत महत्त्वाचा विषय आहे. बेरोजगारी नष्ट करण्यासाठी सरकारी व खासगी पातळीवर रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प आपण सोडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नव्या वर्षात ग्रीन उद्योग यावे, आयटी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक व्हावी, त्यातून रोजगार संधीही प्राप्त होईल, असा संकल्पदेखील सोडलेला आहे.
नव्या वर्षात पारंपरिक व्यवसाय, शेती, बागायती, सारे काही उद्योग नव्याने सुरू व्हावेत यासाठी सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी हिंटरलँड व आरोग्य क्षेत्रातील पर्यटन यांनाही प्रोत्साहन दिले जाईल. नव्या वर्षातील सर्वांत मोठे उद्दिष्ट म्हणजे राज्यतील खाण व्यवसाय पुन्हा सुरू होणे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातीलच. शिवाय हरित गोवा स्वच्छ गोवा या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा मानस मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
नवीन वर्ष म्हणजे आनंदाचा क्षण : राज्यपाल
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील लोकाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्षाचा आनंदाचा क्षण आहे. अनेकांसाठी नवीन वर्ष समारंभ म्हणजे मागील वर्षाचा अनुभव घेऊन जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी चांगली संधी आहे. जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही आपले विचार ताजे करतात आणि वचनबध्दतेसाठी नव्याने तयारीला लागतात. नवीन वर्ष आपल्याला नवीन आशा आणि आकांक्षा घेऊन येते. नवीन वर्ष म्हणजे प्रत्येकांच्या जीवनातील खरोखरच एक नवीन अध्याय आहे. सलोख्याने आणि एकतेने राहण्याचा आमचा संकल्प मजबूत करण्यास हा योग्य प्रसंग आहे. नवीन वर्ष आपण सर्वाना शांतता, सुख, आनंद आणि भरभराट घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.