प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे जागतिक पातळीवर भारताचे नाव लौकिक होणार आहे, असे उच्चशिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अशोकनारायण यांनी सांगितले. शुक्रवारी जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील जिरगे सभागृहात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
राणी चन्नम्मा विद्यापीठ, केएलई संस्थेचे राजालखमगौडा विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल 34 वर्षांनंतर शैक्षणिक पध्दतीत बदल होत आहे. स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक धोरणात होणारा हा तिसरा बदल आहे.
कर्नाटक राज्य उच्च शिक्षण परिषदेचे कार्यकारी संचालक प्रा. गोपालकृष्ण जोशी व रामय्या पब्लीक पॉलीसी सेंटरचे उपसंचालक डॉ. चेतन सिंगाई यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल मातिही दिली. यावेळी विधानपरिषदेतील भाजपचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, विधानपरिषद सदस्य हणुमंत निराणी, विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, माजी आमदार संजय पाटील, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली आदीं उपस्थित होते. या कार्यशाळेत विद्या विषयक परिषदेचे सदस्य व वेगवेगळय़ा कॉलेजचे प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.