चेन्नई / वृत्तसंस्था
नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आता काही राजकीय पक्षा सरकारच्या या निर्णयावर टीका करू लागले आहेत. काँग्रेसपाठोपाठ आता मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हासन यांनी विचारला आहे. तामिळनाडूत 2021 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्यावरुन त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
राजधानी दिल्लीत तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून नवे संसद भवन उभारले जाणार आहे. यासंबंधी बोलताना “अर्धा देश उपाशी झोपत असताना एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? कोरोना विषाणूमुळे लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितले की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवे संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे’’ असे कमल हासन यांनी म्हटले आहे.