ऑनलाईन टीम / पुणे :
‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे. बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणाऱया ‘सीएए’-‘एनआरसी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
शनिवार पेठेत आरपीआयच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे आणि कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत ‘सीएए’, ‘एनआरसी’बाबत देशातील मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा कायदा नागरिकत्व देणारा असून, हिरावणारा नाही.