प्रतिनिधी /बेळगाव
‘स्वच्छ बेळगाव सुंदर बेळगाव’ असा नारा आपण देतो. मात्र, आपलेच बेळगाव अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर टाकत असल्याने रस्त्यावर कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यात भरीस भर म्हणून भटकी कुत्री अन्नाच्या शोधात कचरा विस्कटत असल्याने परिसर अस्वच्छ बनत आहे. येथील भाग्यनगर चौथा क्रॉस येथे कचराकुंड नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. याबाबत ‘तरुण भारत’ने रविवारी सकाळी फेसबुक पेजवर वृत्त प्रसिद्ध करताच केवळ अर्ध्या तासातच येथील कचऱयाची उचल करण्यात आली आहे.
भाग्यनगर चौथा क्रॉस येथे कचराकुंडी नसल्याने सदर समस्या उद्भवली आहे. या भागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करूनदेखील नागरिक आपल्या घरातील कचरा घंटागाडीकडे न देता रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ बनत असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. भटकी कुत्री हा कचरा सर्वत्र विस्कटत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भाग्यनगर येथील बहुतांश भागात कचराकुंड नसल्याने आपला परिसर सोडून रिकाम्या जागेत नागरिक कचरा टाकत आहेत. या कचऱयाची वेळेवर उचल करण्यात येत नसल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. नागरिकांच्या चुकीमुळेच ही परिस्थिती उद्भवत असून कचरा रस्त्यावर टाकण्यात आल्यास नागरिकांकडून दंड आकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.