जगाबरोबर भारतातही येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा सोहळा नाताळ म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र मानून, त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेवणे हे ख्रिस्तीधर्मीय आपले कर्तव्य मानतात. येशू ख्रिस्ताला सुळावर दिले तरी तो सदासर्वकाळ जिवंत आहे आणि मानवी समाजाच्या मुक्ततेसाठी त्याचे पृथ्वीतलावर आगमन झालेले आहे अशी ख्रिस्ती समाजाची धारणा आहे. श्रीमंत, गरीब, काळा, गोरा, उच्च, नीच असा भेदाभेद न मानता, जो आपल्या पापांची कबुली देऊन, त्याबाबत पश्चात्ताप करतो त्याचे येशू रक्षण करतो, अशी ख्रिश्चनांची श्रद्धा आहे. देव एकच असला तरी आकाशातील पिता, त्याचा पुत्र येशू व पवित्र आत्मा अशी त्याची तीन रूपे असून ही तिन्ही रूपे मिळूनच एकच परमेश्वर याचे पालन ख्रिस्ती समाज करतो. परमेश्वर सनातन, स्वयंभू, अनंत असून तोच सृष्टी निर्माता आहे आणि सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आहे अशी ख्रिश्चनात श्रद्धा आहे. स्वर्गातील पवित्र आत्म्याने येशूचा अभिषेक केला म्हणून ग्रीक भाषेत ख्रिस्त शब्द त्याला रूढ झाला आणि त्यामुळेच त्याच्या अनुयायांना ख्रिस्ती म्हटले जाऊ लागले. येशूने ईश्वराला मानवी समाजाचा पिता मानले आणि त्याच्यावर भक्ती करण्याचा संदेश दिला. समस्त मानव ही प्रभूची लेकरे असून त्यांच्यावर प्रेम करणे हीच खरीखुरी ईश्वरभक्ती मानली.
ख्रिस्ती धर्मात कर्मकांडाऐवजी प्रार्थनेला महत्त्व असून परमेश्वराच्या अनंत उपकारांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची प्रार्थना करून देवाचे राज्य आणि येशूचे पुनरागमन व्हावे अशी भाविक इच्छा व्यक्त करतात. पॅलेस्टाईनच्या प्रदेशात यहुदीचे वास्तव्य होते. इसवी सनाच्या 63 वर्षांच्या पूर्वी हा प्रदेश रोमन साम्राज्याखाली आला तेव्हा तेथे यहुदी धर्माला विशेष स्थान राहिले नाही म्हणून तेथील लोक तारणहाराच्या प्रतीक्षेत असताना येरूसलेमजवळच्या बेथलेहम येथे देवदूत गॅब्रियलने मेरीच्या उदरी तेजस्वी देवपुत्राचा जन्म होणार असल्याची सुवार्ता दिली. मेरीचा ज्याच्याशी विवाह ठरला होता त्या योसेफला त्याची कल्पना दिली. हेरोद राजाने आरंभलेल्या जनगणनेत सहभागी होण्यासाठी मेरी आणि योसेफ बेथलेहम येथील माळरानावरच्या गोठय़ात असताना गाई-मेंढय़ांच्या सान्निध्यात रात्री बाराच्या सुमारास येशूचा जन्म झाला तो गवताच्या बिछान्यावर. त्यावेळी आकाशातही तेजस्वी तारा उगवला आणि दिव्य संकेताने त्या ताऱयाचा शोध घेत आलेल्या पूर्वेकडच्या तीन पंडितांना बाल येशूचे दर्शन झाले. राजांचा राजा येशूच्या जन्माने हेरोद राजाला आपल्या अस्तित्वाला संकटांची भ्रांती निर्माण झाली आणि त्यासाठी त्याने बेथलेहम व परिसरात जन्माला आलेल्या बालकांची हत्या करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येशूच्या मातापित्याने त्याला इजिप्तमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात यश मिळविले. कालांतराने येशू जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याने ‘रोग, मृत्यू व पाप’ यांच्यावर विजय मिळविणारी अद्वितीय शक्ती आपल्या ठायी असून, आपणच ईश्वर असल्याचे प्रतिपादन केले. कर्मकांडांना प्रखर विरोध आरंभला आणि यामुळे रोमन अधिकाऱयांनी त्याला पकडून सुळावर दिले.
सुळावर आत्मबलिदान केल्यानंतर तीन दिवसांनी येशूचे पुनरुत्थान झाले आणि त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिले. त्यानंतर 40 दिवसांनी येशू स्वर्गस्थ झाला. पॉल नामक धर्मोपदेशकाने येशूला मसिहा मानून त्याची शिकवण सर्वसामान्यांना देण्यास प्रारंभ केला. सिरियातील अंटिओख येथे ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान व आचार यांचा प्रचार करण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी रोमन सम्राटाने ख्रिस्ती समाजाची छळवणूक आरंभली. अनुयायांना जीवे मारले. परंतु जेव्हा इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली तेव्हा ख्रिस्ती धर्माला राजाश्रय लाभला आणि युरोप ख्रिस्ताच्या प्रभावाखाली आला. येशूचा अनुयायी सेंट थॉमस इसवी सनाच्या 52 साली भारतातल्या मलबार प्रांतात आला आणि तेथे चर्चेस उभारली. इराण व आशियामायनर येथील धार्मिक छळवादाप्रसंगी ख्रिश्चनांना भारतात आश्रय मिळाला. त्यानंतर ख्रिस्ती धर्माचा सक्तीने प्रसार करण्यात पोर्तुगीज सत्ताधीशांसोबत असलेल्या धर्माधिकाऱयांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे गोवा, कोचीन, तुतिकोरीन ही ख्रिस्तीधर्मियांची भारतातील महत्त्वाची केंद्र बनली.
आरोग्य, समाजसेवा, शिक्षण आदी क्षेत्रात ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी प्रवेश करून ब्रिटीश अमदानीत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यात यश मिळविले. आज भारतभरातील ख्रिस्ती समाजासाठी नाताळ सण आनंदाचा सोहळा ठरलेला असून, 24 डिसेंबरच्या रात्री बाराला येशूचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. येशूचा जन्म गोठय़ात झाला, त्या घटनेची आठवण ख्रिसमस क्रिब म्हणजे नाताळाच्या गोठय़ाद्वारे जागविली जाते. बाराव्या शतकापर्यंत ख्रिस्ती भाविक बेथलहेमला जाऊन मूळ जन्मस्थानाचे दर्शन घेत होते. परंतु तेराव्या शतकात हा प्रांत मुसलमानांच्या ताब्यात गेल्याने ख्रिस्ती भाविकांना तेथे भेट देणे कठीण बनले तेव्हा इटलीतील फ्रान्सिस व त्यांच्या साथीदारांनी बेथलहेम येथील गोठय़ाची प्रतिकृती असिसी येथे बनविली आणि तेव्हापासून माता मेरी व बाल येशू यांच्या प्रतिमेसह गोठा उभारण्याची परंपरा लोकप्रिय होत गेली. आदिमानव आदाम व इव्ह यांनी देवाज्ञेचा भंग करून पारादीस बागेतील ज्ञानवृक्षाच्या फळाचा आस्वाद घेतला आणि त्यामुळे त्यांच्या हातून पापकर्म घडले. त्यांच्या पापासाठी आणि समस्त मानवाच्या उत्थानासाठी प्रुसावर आत्मबलिदान केले त्याची स्मृती ख्रिसमस वृक्षाने जागविली जाते.
लॅटिन भाषेतील ‘दियेस नातालीस’ या लॅटिन शब्दांद्वारे भगवान येशूच्या जन्मदिनाला ‘नाताळ’ ही संज्ञा लाभली. ज्ञानी लोकांनी येशूचरणी नेणाऱया ताऱयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ ख्रिस्ती घरासमोर सुंदर तारा लटकवण्याची परंपरा रूढ झाली. सहा हरणांच्या गाडीतून बालगोपाळांना मिठाई वाटणारा संत निकलस सांताक्लॉजच्या रूपात नाताळाचा आनंद द्विगुणित करतो. येशूच्या जन्माने नव्या विचारांची दिशा लाभून भाविकांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार लोप पावला. जगण्याला नवे तेज आणि आत्मबळ लाभल्याची भावना भाविकात प्रचलित झाली आणि त्यामुळे नाताळाच्या सणात उत्साहाला उधाण येतो.
देशभर नाताळ साजरा होत असला तरी गोव्यासारखी नाताळाची परंपरा अन्यत्र अभावानेच पहायला मिळते. यंदा कोविड-19 च्या संकटछायेखाली नाताळ साजरा होत असताना नियमांचे पालन करून, भगवान येशूच्या मानवी मूल्यांचे विस्मरण होऊ न देता उत्साह, उल्हास वृद्धिंगत करणे महत्त्वाचे आहे.
राजेंद्र पां. केरकर