सुरांचं वेड लागणं यासाठी वयाची अट कधीच नसते. किंबहुना माणसाला आपलं वयच विसरायला लावणारी ती गोष्ट आहे. पण मनात जर लहानपणीच सूर पेरले गेले असतील तर ते उगवूनही लवकर येतात. आणि त्याची रसाळ गोमटी फळंही तितकीच लवकर चाखायला मिळतात. म्हणाल तर अगदी साधा प्रसंग. घराण्यात पिढय़ानपिढय़ा चालत आलेला उत्सव सुरू होता. दररोजप्रमाणे बुवा कीर्तनाला उभे राहिले. त्यांनी श्रोत्यांना ‘रघुपती राघव’चा गजर सांगायला सुरुवात केली आणि त्याच घरातला एक तीन साडेतीन वर्षांचा मुलगा त्या तालावर नाचायला लागला. मोठं लोभस रूप होतं ते. गळय़ात अडकवलेल्या इवल्या झांजा, कपाळावर छोटासा टिळा आणि त्या ठेक्मयावर नाचणारी पावलं. जणु देवबाप्पाच त्याच्या रूपात येऊन कीर्तनरंगी नाचत असावेत. गंमत म्हणजे ‘पुंडलीक वरदा’ झाल्यावर तो हळूचकन आत निघून गेला. यात त्याने कुठेही एकदाही कीर्तनसभेला एक क्षणही धक्का लावला नाही की काहीही विचित्र वर्तन केलं नाही. पण गजर सुरू झालेला त्याला अचूक समजत होता आणि पावलं जराही ठेक्मयाबाहेर जात नव्हती. बघणाऱयाला हेवा वाटावा आणि आपली मुलं अशी इतकी शांत का नाही बसत नाहीत असा प्रश्न त्यांच्या आयांना पडावा असा तो छान बाळ होता. अशी छोटी छोटी मुलं आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतात. रात्री दोन वाजेपर्यंत जागून मैफिल ऐकणारी मुलं असतात. तशीच अख्खं कीर्तन बुवांच्या समोर बसून ऐकणारी मुलंही असतात. गॅदरिंगमध्ये सहज आणि सुंदर परफॉर्मन्स देणारी मुलं आपण पहातो. एक गोष्ट निश्चित आहे की कलेची आवड असणं हे पिंडातच असावं लागतं. ती आतून बाहेर उमलत येणारी असते. बाह्य वातावरणातून ती आत पाठवता येत नाही. म्हणून आपल्या मुलाला सगळं काही आलंच पाहिजे या अट्टाहासाने त्याला तबला पेटी गायन वगैरे शिकायला पाठवणाऱया पालकांना आपलं मूल स्पर्धेत जिंकायला पाठवायचं असतं. त्यामुळे अपेक्षित रिझल्ट आले नाहीत की मग हलकल्लोळ उडतो. संगीत हे आनंदाचं बीज आहे. ती अनुभवायची गोष्ट आहे. पाऊस पडल्यानंतर दरवळणाऱया गंधासारखा तो आनंद आहे हे ज्याला कळतं तो असले अट्टाहास करणार नाही. देवासमोर लावलेला दिवा रात्रभर तेवत राहतो कारण त्यात तेवढं तेल घालून वातीची तजवीज केलेली असते. ज्याच्या घरात ही उत्सवाची परंपरा आहे किंवा ज्याच्या घरात अशा उत्सवासाठी आवर्जून हजेरी लावण्याची सवय आणि आवड आहे त्यांना या तेवणाऱया दिव्यांनी आदर्श घालून दिलेला असतो. त्यामुळे बाहेरच्या दिखाऊ झगमगाटाला ते भुलत नाहीत. आणि वर्षानुवर्षे रियाजाचं तेल घालून आपलं गाणं तेवत ठेवतात.
आपल्या परंपरेत संगीत हे पुलंनी म्हटल्याप्रमाणे देवळातून बाहेर पडलेलं. देवसेवा म्हणून सादर केली जाणारी नृत्यकला, संगीतकला ही पूजेचं साधन म्हणून होती. साहजिकच पदांमध्ये वर्णनही ईश्वराचं आणि डोळय़ांसमोर तोच. आपल्याकडे कर्नाटकात असलेलं विजय विठ्ठल मंदिर, तिरुनेलवेलीचं महादेव मंदिर, विरूपाक्ष आणि लेपाक्षी मंदिर यांसारख्या कित्येक मंदिरांच्या सभामंडपातले खांबही संगीतोपयोगी नाद निर्माण करतात. एकेकाळी अशा मंदिरात अखंड नादब्रह्म नांदत असेल ना? या त्याच्याच आजच्या खुणा आहेत. देवाची सेवा करण्याच्या निमित्ताने आळवलेले सूर बघता बघता कसे आपले होऊन जातात हे गाणाऱयालाही लक्षात येत नसेल. हेच बघत बघत वाढणाऱया मुलाला आपोआप ताल धरता येऊ लागतो. नकळतच समेची जागा अचूक पकडता येते. आपण काय करतोय याचा हिशेब लागण्याआधीच सुरांचा हिशोब लागायला लागतो. जे समोर घडतं तेच मुलं शिकत जातात. ‘गवयाचं पोर सुरात रडतं’ असं म्हणतात ते उगीच नाही. सतत रियाज ऐकणारं मूल आपोआपच शिकतं. आपल्या ओंजळीत काय आहे हे त्याला कधीकधी माहीतही नसतं पण घडून गेलेलं असतं. ज्या माणसाच्या घरात विशेष असा संगीत वारसा नसतो त्याला अशांचा अक्षरशः हेवा वाटतो. कारण ही श्रवणभक्ती खूप महत्त्वाची असते. ती नकळत्या वयात जेव्हा होते तेव्हा खूप काही देऊन जाते. पूर्वीच्या काळी गुरुगृही राहूनच गाणं शिकायचं असा प्रघात होता. अजूनही काही मोठी कलाकार मंडळी या पद्धतीचा अवलंब करणारी आहेत. हे का? तर चोवीस तास रियाज घडावा, अग्निहोत्राप्रमाणे स्वरहोत्र घडावं तेव्हा कुठे एखादा स्वर पूर्णांशाने वश होत असतो. सतत ऐकल्याने ते एवढे पक्के होतात की अशा घरातलं मूल समजा गाणं शिकलं नाही तरी ते मोठेपणी उत्तम श्रोता होतं. चांगलं गाणं म्हणजे नक्की काय हे त्याला समजू शकत असतं. स्वतःच्या घरातल्या मुलांना गाणं समजावून सांगू शकतात. त्यांनाही गाण्याच्या बैठकीला नेतात. साहजिकच त्यांच्या घरातलं मूल गाण्यात रस घेऊ लागतं आणि कलाकारही होतं. म्हणजे ज्या घराण्यात स्वरसंस्कार असतात, विशेषतः एखाद्या देवतेचा उत्सव करण्याच्या निमित्ताने कीर्तन, भजन, गाणं वगैरे वर्षानुवर्षे केलं जातं त्यांच्या घरातल्या मुलांना तर त्याचा फायदा मिळतोच पण गावातल्या अन्य एखाद्या मुलालाही तितकाच फायदा होतो. कारण या उत्सवाने त्याची सांगीतिक भूक भागवलेली असते आणि स्वरेष्णा जागवलेलीही असते.
कित्येकदा देवस्थान मालकांच्या आर्थिक हिमतीप्रमाणे आणि हौसेप्रमाणे कीर्तनकार आणि कलाकार बोलावले जातात. एका गावात दरवषी येणाऱया कीर्तनकारांना एकाएकी आलेल्या अडचणींमुळे त्यावषी येताच आलं नाही. आयत्यावेळी कुणी कीर्तनकार बुवाही मिळेनात. शेवटी गावकऱयांनी चक्क तिथल्या शाळेत काम करणाऱया एका गुरुजींना विनंती केली. त्यांनी बिचाऱयांनी कधीच कीर्तन केलेलं नव्हतं. ते काही गाणं वगैरे शिकलेही नव्हते. बिचारे हैराण झाले. पण गावकऱयांचा विश्वास दांडगा! ‘गुरुजी, तुम्ही इतकी वर्षं इतकी कीर्तनं ऐकलीत. आणि शाळेत मुलांसमोर बोलण्याचा तुम्हाला अनुभव आहेच. तोच इथे वापरा. देवस्थान तुमच्याकडे अपेक्षेने पाहतंय. ही देवसेवा आहे. ‘तो’ आहे सांभाळणारा! तुम्ही काही काळजी करू नका. फक्त नारदाच्या गादीवर उभे रहा.’ असं म्हणून गावकऱयांनी त्यांना उभं केलंच. आश्चर्य म्हणजे काहीही सराव नसतानाही ते कीर्तन बऱयापैकी छान वठलं आणि गुरुजींनाही कान्फिडन्स आला. ते दरवषी कीर्तनाला उभे राहू लागले. पुढे पुढे तर त्यांनी कीर्तन शिकायलाही सुरुवात केली. आज गुरुजी एक उत्तम कीर्तनकार म्हणून परिचित आहेतच पण तो वारसा त्यांच्या उच्चशिक्षित मुलांनीही पुढे चालवला आहे. देवस्थानातल्या महाप्रसादासारखीच तिथे ऐकायला मिळणाऱया गाण्याची गोडीही अवीट आणि वेगळीच असते. तीत प्रासादिकता असते. म्हणून खरं तर नतमस्तक झालं पाहिजे ते असे उत्सव राखणाऱयांच्या पायी! ते नेटाने जबाबदारी घेऊन असे देवस्थानचे उत्सव पार पाडत असतात. म्हणून संगीताची गंगोत्री वाहत रहाते. खरोखरच त्यांच्याबाबतीत म्हणायचं झालं तर ‘नाही पुण्याची मोजणी’ असंच म्हणावं लागेल.
-अपर्णा परांजपे-प्रभू