नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री व जदयूचे नेते नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दहा पक्षाच्या नेत्यांसह आपण सोमवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून, सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा आहे, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. म्हणाले, काही लोक आधीच दिल्लीला पोहोचले आहेत आणि काही उद्या माझ्याबरोबर येतील, आपण उद्या आपण ११ वाजता भेटू, असं ते म्हणाले. उद्याच्या बैठकीत जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर तोडगा निघेल की नाही, असं विचारल्यावर नितीश कुमार म्हणाले की, आमच्या बैठकीतील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर चर्चा करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून आम्ही पंतप्रधानांची भेट घेण्यास इच्छूक आहोत. यावर काही निर्णय झाला तर खूप बरं होईल. जातीनिहाय जनगणनेचा केवळ बिहारलाच नाही तर संपूर्ण देशातील लोकांना फायदा होईल. किमान एकदा तरी जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी, यासाठी आम्ही आमचा मुद्दा उचलून धरणार आहोत.
नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी जातीनिहाय जनगणनेनंसंदर्भात एक ट्विटही केलं होतं. ‘आमची अशी भूमिका आहे की, देशात जातीच्या आधारावर जनगणना व्हायला हवी. बिहार विधान परिषदेने १८ फेब्रुवारी २०१९ रोजी, तर २७ फेब्रुवारी २०२० रोजी विधानसभेनं एकमताने यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला होता. तसेच हा प्रस्ताव केंद्राकडेही पाठवण्यात आला होता. या मुद्द्याचा केंद्र सरकारने पुनर्विचार करायला हवा’, असं नितीश कुमार यांनी २४ जुलै २०२१ रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.