सातारा / प्रतिनिधी :
जिल्हयाच्या पश्चिम भागात मागील 15 दिवसांपूर्वी धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत करुन टाकले तर या पावसाने दरड कोसळून अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले. पाटण तालुक्यातील कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वर, जावली भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. मात्र, गत दोन दिवसात पावसाने चांगलीच उघडीप दिली असून, सूर्यदर्शनाने वातावरणातील कोंदटपणा नाहीसा झाला आहे.
चांगल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 91 टीएमसीपर्यंत पोहोचला जिल्हय़ातील इतर छोटी, मोठी धरणे, बंधाऱ्यातील पाणी साठाही वाढला आहे. या पावसाने सध्या गतवर्षीपेक्षा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा झालेला आहे. धोम धरणातून नदी व बोगद्याद्वारे 600 क्युसेक्स तर बलकवडी धरणातून 1740 व तारळी धरणातून 1899 क्युसेक्स वेगाने विसर्ग होता. तर कण्हेर, उरमोडीतही चांगला पाणी साठा झाला असून या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सध्या धोम, कण्हेर, कोयना, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणी साठा असल्याने समाधानकारक स्थिती आहे.