पणजी / प्रतिनिधी
माजी संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर त्यांच्या निधनानांतर निराधार आरोप करणाऱया काँग्रेस पार्टीने अगोदर इतिहास तपासून पहावा. काँग्रेसचे तकलादू आरोप पाहता ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को’ ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू होते असेच म्हणावे लागेल. स्वर्गीय पर्रीकरांच्या विरोधात आरोप करून आपले पाप झाकण्याचा हा काँग्रेसी प्रयत्न अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केली आहे.
गोव्यात अमर्याद खाण उत्खनन व वाहतूक झाली ती काँग्रेस सरकारच्याच काळात. जस्टीस शाह कमिशनची नियुक्ती केली ती काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंग सरकारनेच. सदर कमिशनचा अहवाल त्याच काँग्रेस सरकारने स्वीकारला व संसदेसमोर ठेवला. पर्यावरण परवाने देखील त्याच काँग्रेस सरकारातील तत्कालीन पर्यावरणमंत्री श्रीमती जयंती नटराजन यांनीच निलंबित केले.
जनतेला आर्थिक मदतीचा आधार दिला
या परिस्थितीतून मार्ग काढत खाण अवलंबित जनतेला आर्थिक मदतीचा आधार दिला तो स्व. मनोहर पर्रीकर, नंतर प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व आता डॉ. प्रमोद सावंत यांच्याच सरकारने. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश व घालून दिलेल्या निर्देशनुसार खाण वाहतूक भाजपा सरकारनेच सुरू केली व त्यामुळे हजारो लोकांना मदत झाली.
खोटे आरोप काँग्रेस पार्टीच करते
खाण संबंधी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या सर्व सरकारांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. खाण प्रश्न सोडवण्यासाठी आताचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी व न्यायालयीन पातळीवर जोरदार प्रयत्न चालवले आहेत. निवडणुका जवळ आल्या की आरोप करणे आलेच. पण त्याहीपेक्षा ते धादांत खोटे व वस्तुस्थिती विपरीत आहेत. हे केवळ काँग्रेसच पार्टीच करू शकते.
काँग्रेसचे नेते झालेय सैरभैर
आज गोव्यातील काँग्रेस पक्ष व त्यांचे नेतृत्व सैरभैर झाले असल्याचेच हे द्योतक आहे. भारतीय जनता पार्टी व पार्टीचे सरकार जनतेच्या व गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समर्पितपणे काम करीत असून काँग्रेसच्या भुलथापाना गोव्यातील जनता बळी पडणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असेही सावईकर यांनी म्हटले आहे.