अपेक्षेपेक्षा तीव्र गतीने आणि विशेष प्रतिकार न होता अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला आहे. सारे जग या घटनेकडे चिंताग्रस्त दृष्टीने पहात आहे. आता या देशाचे काय होणार हा तर चिंतेचा विषय आहेच, पण तेथे जे काही होईल, त्याचे जगावर कसे परिणाम होतील, हा सर्वाधिक चिंतेचा आणि धास्तीचा विषय आहे, असे जगभरातून उमटणाऱया प्रतिक्रियांवरून दिसून येते. तालिबानने आपली कार्यपद्धती आणि विचारसरणी बदलली तरच ही चिंता दूर होऊ शकते. अन्यथा ही चिंता खरी ठरून जगासमोर धोका निर्माण होऊ शकतो. हा विषय समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावणे भाग आहे. 1990 च्या दशकात याच तालिबानची सत्ता अफगाणिस्तानात होती आणि त्यावेळी त्यांनी तेथे केलेले अत्याचार आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. विशेषतः महिलांच्या संदर्भात तालिबानची भूमिका आणि धोरणे मध्ययुगीन आहेत. महिलांनी बुरख्यातच रहायचे, जवळच्या पुरुष नातेवाईकाला बरोबर घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही, आधुनिक शिक्षण घ्यायचे नाही, केवळ घर सांभाळणे आणि मुलांना जन्म देणे ही दोनच त्यांची कर्तव्ये आहेत आणि ज्या महिला हे नियम पाळणार नाहीत, त्यांना मृत्यूदंडाची किंवा अत्यंत कठोर शिक्षा द्यायची, अशा अमानुष पद्धतीने तालिबानचा कारभार त्या काळात चालला. गुलाम म्हणून महिलांचा लिलाव करून त्यांना विकण्याच्या मध्ययुगीन क्रूर प्रथेचे त्यांनी पुनरुज्जीवन केले होते. तालिबानची आज्ञा मोडणाऱया पुरुषांच्याही सरसकट हत्या करण्यात येत होत्या. इतर सारे जग काळाबरोबर पुढे जात असताना तालिबान आणि तत्सम दहशतवादी इस्लामी संघटना त्यांच्या प्रभावाखालील प्रदेशांमध्ये सहाव्या शतकातील परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपल्या अधिकाराचा उपयोग करीत होत्या. तालिबानला खरे बळ मिळाले, ते रशियाने 1978 मध्ये अफगाणिस्तानचा लष्करी ताबा घेतल्यानंतर. रशियाच्या विस्तारवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि त्याला अफगाणिस्तानमधून हुसकून लावण्यासाठी अमेरिकेने तालिबान या संघटनेला शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण, आधुनिक शस्त्रास्त्रे, तसेच मोठे आर्थिक बळ पुरविले. पाकिस्ताननेही भारताविरुद्ध लाभ घेता येईल, असा विचार करून आपल्या भूमीचा उपयोग तालिबानला करू दिला व त्यासाठी बरीच मोठी किंमत अमेरिकेकडून वसूल केली. त्या कालखंडात पाकिस्तानात झिया उल हक सत्ताधीश होते. पुढे त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. पण तोपर्यंत अफगाणिस्तानात तालिबानने पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित केले होते. 1989 पर्यंत तालिबानच्या हल्ल्यांसमोर रशियासारखी बलाढय़ महासत्ताही निष्प्रभ झाली होती. रशियाला अफगाणिस्तानातून तर माघार घ्यावी लागलीच, पण पुढे रशियाचेही तुकडे होऊन त्या देशातील अनेक भाग स्वतंत्र राष्ट्रे बनले. हा संपूर्ण कालावधी इस्लामी दहशतवादाच्या उदयाचा होता आणि तालिबान ही संघटना सर्वात प्रबळ होती. त्यामुळे ओसामा बिन लादेन याच्या अल् कायदा या संघटनेला अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रय मिळाला. स्वतः लादेननेही अफगाणिस्तानातून आपल्या कारवाया चालविल्या होत्या. पुढे अल् कायदाने प्रत्यक्ष अमेरिकेतच 2001 मध्ये विमाने आदळवून हल्ले करून दहशतवादाची परिसीमा गाठली. त्यानंतर अमेरिकेला अफगाणिस्तानातील तालिबानविरोधात सामरिक कारवाई करणे भाग पडले आणि तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेचे हजारो सैनिक अफगाणिस्तानात तळ ठोकून होते. 2001 ते 2021 या दोन दशकांच्या कालखंडात अमेरिकेलाही तालिबान आणि दहशतवाद संपविणे शक्य झाले नाही. तालिबानपासून स्फूर्ती घेऊन अल् कायदा आणि त्यानंतर आयएआयएस या दहशतवादी संघटनांनी इराक, सीरिया आदी देशांमध्ये हिंसाचाराचा हाहाकार माजविला होता. याखेरीज, पाकिस्तानने अनेक दहशतवादी संघटनांना पोसले होते आणि आजही पोसत आहे. दहशतवादाच्या या 25 वर्षांच्या प्रभावकाळात जगातील जवळपास प्रत्येक लोकशाही राष्ट्रात मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. भारत तर दशहतवाद्यांचे विशेष लक्ष्य होता. याशिवाय अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये मोठे दहशतवादी हल्ले झाले. तालिबानपासून स्फूर्ती घेऊन असंख्य दहशतवादी संघटना निर्माण झाल्या. जगात एकंदर किती इस्लामी दहशतवादी संघटना आहेत, त्यांची संख्याही नेमकी सांगणे कठीण आहे. कारण एक संघटना अस्ताला जाईपर्यंत नव्या तयार होत असतात. सध्याच्या काळात अल् कायदा आणि आयएसआयएस या संघटना फारशा प्रभावशाली राहिलेल्या नाहीत. हा सारा इतिहास सांगण्याचे कारण असे की, या साऱया दहशतवादाचा जगभर प्रादूर्भाव होण्यासाठी ज्या तालिबानचा उदय कारणीभूत ठरला होता, त्याच तालिबानकडे आज पुन्हा अफगाणिस्ताची सत्ता गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगात इस्लामी दशहतवादी उचल खाणार का, आणि तसे झाल्यास जगावर त्याचे परिणाम काय होतील, हा चिंतेचा विषय झाला आहे. तथापि, आशेचा एक किरण आहे. तालिबाननेच आपली कार्यपद्धती बनलेली आणि जबाबदारीने वागण्याचे ठरविले तर एक नवा इतिहासही घडू शकतो. अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर या संघटनेने सर्व सरकारी अधिकाऱयांना अभय दिले आहे. तसेच हिंदू आणि शीख नागरिकांना धोका पोहचविणार नाही, असे आश्वासन दिले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचे पूर्वापारपासून सौहार्दाचे संबंध आहेत. ते तालिबानच्या नव्या राजवटीतही कायम राहिले तर आशेला जागा आहे. अन्यथा भारताला आपल्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे भाग आहे. अफगाणिस्तानात भारताची मोठी गुंतवणूक आहे आणि भारताने तेथे मोठी आस्थापने निर्माण केलेली आहेत. काही हिंदू आणि शीख लोक तेथे आजही रहात आहेत. भारताने निर्माण केलेल्या आस्थापनांचे संरक्षण, हिंदू आणि शीख लोकांचे जीव, मालमत्ता आणि रोजगाराची साधने यांचे संरक्षण, तसेच भारताशी मैत्रीपूर्ण संबंध आदी बाबी सुरळीत झाल्यास हे होऊ शकते. अन्यथा भारतालाही योग्य ती पावले उचलणे अनिवार्य ठरणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तानातील चित्र स्पष्ट होईल.
Previous Articleभारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने
Next Article खाद्यतेलासाठी 11,000 कोटीची योजना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.