प्रतिनिधी/ रत्नागिरी
गतवर्षी 3 जून 2020 रोजी कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. यानंतर त्वरित पंचनामे करण्यात आले होते. या वादळातील नुकसानीपोटी शासनाकडून 201 कोटी 59 लाख 25 हजार रूपये प्राप्त झाले. त्यापैकी 152 कोटी 42 लाख 97 हजार 528 रुपयांचा निधी नुकसानग्रस्तांना वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
गतवर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अद्यापही काही लोकांना मिळाली नसल्याचे सांगितले जात होते, मात्र प्राप्त झालेल्या 202 कोटी 59 लाखांपैकी 152 कोटी 42 लाख 97 हजार 528 रूपये वितरित करण्यात आले आहेत. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले, अशा सर्वांना ही मदत देण्यात आली आहे. 100 टक्के पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले होते, त्यानुसारच भरपाई वाटप नियोजनपूर्वक करण्यात आल्याचे नुकतेच जिल्हाधिकारी यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. यामध्ये शेती, प्राणी, गोठे, घरे, झाडे आदींचे नुकसान झालेल्या नागरिकांना ही भरपाई देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.