ऑनलाईन टीम / मुंबई :
अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर आज दुपारपर्यंत धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, ‘निसर्ग’शी सामना करण्यासाठी NDRF सज्ज झाले आहे.
सद्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असून, आज दुपारपर्यंत त्याचे रूपांतर वादळात होईल. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या काळात विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही, तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अनु उर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.