प्रतिनिधी/ चिपळूण
शहरासह परिसरात महापुराने हाहाकार उडवल्यानंतर आता उद्ध्वस्त चिपळूणवासीयांसाठी हजारो हात मदतीसाठी जिल्हा व जिल्हय़ाबाहेरून सरसावले आहेत. मात्र त्यात बाधित नसलेलेच आपले हात धुऊन घेताना दिसत आहेत. पुरात उद्ध्वस्त झालेली खालच्या मजल्यावरील कुटुंबे घरातील चिखल काढत बसली असतानाच बाहेर आलेली मदत मात्र वरच्या मजल्यावरील लोकं घेऊन जात असल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे.
महापुराने मोठी जीवित तसेच वित्तहानी झाली. केवळ नेसलेल्या वस्त्राशिवाय काहीच शिल्लक नसल्याने ते पार उद्ध्वस्त झाले आहेत. हे भयानक चित्र संपूर्ण राज्यात गेल्यानंतर सर्व थरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.पूर ओसरल्यानंतर सामाजिक संस्थांसह असंख्य मदतीचे हात चिपळूणसाठी पुढे सरसावले आहेत. मात्र मदतीबाबत सुरूवातीच्या 4 दिवसांत कोणतेच नियोजन प्रशासनाकडून झाले नसल्याने बाहेरून येणारी मदत मधल्यामध्येच वाटली जात आहे.
चिपळूणमध्ये आज ज्यांचे नुकसान झालेले नाही अशे पहिल्या व दुसऱया माळ्य़ावरील माणसे रस्त्याच्या कडेला उभे राहून, गाडय़ा अडवून मदत सरळसरळ हिसकावून घेत आपली घरे भरत आहेत तर ज्यांची घरे आणि कार्यालये, दुकाने पुरात गेली आहेत त्या व्यक्ती आपली घरे, दुकाने साफ करीत आहेत. त्यांच्यापर्यंत मदतच पोहोचत नाही, ते परिस्थितीशी झगडत आहेत. त्यांना कोणतीच जीवनपयोगी मदत मिळत नाही.
मदत वितरणावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने खरोखरच मदतीची गरज आहे, तिथपर्यंत कोणी पोहोचत नाही. जास्त मदत मुख्य रस्त्याकडेच्या पूरग्रस्तांना मिळत आहे. आतल्या भागात अनेक लोक मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे मदत घेऊन येत आहेत, त्यांनी बाधित व्यक्तीच्या घरात जाऊन मदत केल्यास ते योग्य ठरणारे आहे. सध्या फार चुकीच्या पद्धतीने मदत दिली आणि घेतली जात आहे, यात जो खरा पूरग्रस्त आहे तो मात्र वंचित आहे. अशा परिस्थितीत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या मदतीला दिशा देण्याची गरज सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
.