प्रतिनिधी / सांगे
नेत्रावळी पंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर अर्चना गावकर यांनी सांगे भाजप मंडळ अध्यक्ष नवनाथ नाईक यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. नेत्रावळीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असून मधल्या काळात सरपंचपदावरून घोळ निर्माण झाला होता. या भेटीत मुख्यमंत्र्यांसोबत विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे नाईक यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अर्चना यांचे पती व माजी पंच उदय गावकर, सुभाष वेळीप व सतीश गावकर हजर होते. नेत्रावळी ही गोव्याच्या शेवटच्या टोकाला असलेली ग्रामपंचायत आहे. या पंचायतीला निसर्गाचे वरदान लाभले असून येथे इको-टुरिझमला खूप वाव आहे. पंचायतघराचे काम पूर्ण झाले असून उदघाट्न होणे बाकी आहे. या भेटीत विकासाच्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येणाऱया काळात नेत्रावळी येथील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.