वृत्तसंस्था /काठमांडू :
भारतासोबत सीमा वाद उकरून काढत नागरिकत्वासंबंधी शत्रुत्वाची भूमिका घेतलेल्या पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचा पक्षच आता फुटण्याच्या मार्गावर आहे. नेपाळमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास पक्षात फूट पाडू असा इशाराच प्रचंड यांनी दिला आहे.
तर ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. प्रचंड यांना पक्षामधून चांगलेच समर्थन प्राप्त होत आहे. पक्षाचे दोन माजी पंतप्रधान तसेच अनेक खासदारांनी ओली यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तर नेपाळच्या जनतेत कोरोना महामारीवरून ओली सरकारच्या विरोधात तीव्र संताप दिसून येत आहे.
जनतेचा अपेक्षाभंग
सरकारने जनतेच्या अपेक्षांचा भंग केला आहे. पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी सत्तावाटपाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही प्रचंड यांनी केला आहे. पक्षाच्या एकीकरणावेळी सरकार आलटून-पालटून चालविण्यावर आम्ही सहमत झालो होतो. परंतु मी सत्तापद नाकारले होते. ओली सरकारचा कार्यकाळ पाहिल्यावर माझा निर्णय चुकीचा होता असे वाटू लागल्याचे प्रचंड म्हणाले.