प्रतिनिधी/ बेळगाव
नैऋत्य रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात दुरूस्तीचे काम पूर्ण केले असून, यामुळे रेल्वेची गती वाढल्यास मदत होणार आहे. ताशी 100 ते 110 कि. मी. वेगाने रेल्वे धावण्यास तयार आहे. लोंढा ते मिरज व वास्को ते लोंढा या दोन मार्गांची यामुळे गती वाढणार आहे. गती वाढल्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत रेल्वे प्रवास करता येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात नैऋत्य रेल्वेने रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीसाठी मेहनत घेतली. ज्या ठिकाणी रेल्वेची गती कमी होते अशी ठिकाणे शोधून गती वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. रेल्वेच्या आयुक्तांनी नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणाद्वारे लोंढा ते मिरज या दरम्यानच्या 186 कि. मी. तर सन्वोर्धम ते वास्को या दरम्यानच्या 19 कि. मी. अंतरामध्ये गती वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रेल्वे प्रवास होणार कमी वेळेत
नैऋत्य रेल्वेने लोंढा ते मिरज व वास्को ते लोंढा या दरम्यान रेल्वेची गती वाढविण्यास परवानगी दिल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. एक्स्प्रेस गाडय़ांची गती वाढविण्यासाठी रेल्वे विभाग प्रयत्न करीत आहे. लोंढा दरम्यान जंगलक्षेत्र असल्यामुळे गती वाढविणे कठिण होते. परंतु रेल्वे विभागाने यावर मात केली आहे.