बेळगाव/ प्रतिनिधी:
तालुक्मयात सुगी हंगामला सुरूवात झाली असून बळीराजा भात कापणीत मग्न झाल्याचे चित्र तालुक्मयात पहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने बटाटा रताळी व भुईमूग काढणी लांबणीवर पडली होती. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने काढणी झालेले शेतकरी भात कापणीच्या कामात मग्न झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. मात्र अधून-मधून आभाळ येत असल्यामुळे कापणीत व्यत्यय येत आहे. यंदा बटाटा उत्पादनात कमालीची घट्ट झाल्याने बटाटा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुगी हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे होती. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने सुगी हंगामातील कामे वेळेत संपविण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू झाली आहे. बटाटा, भुईमूग, रताळी काढणीनंतर शेतकरी आता भात कापणीकडे वळला आहे. सुगी हंगाम सगळीकडे एकदमच सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शिवारात पाणी साचून राहिल्याने भात कापणीत अडथळा निर्माण होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पश्चिम भागातील कुद्रेमनी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, कोनेवाडी, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगा, सुळगा, मण्णूर, बेळगुंदी, बडस, कल्लेहोळ, राकसकोप, आदी भागात भात कापणीची लगबग सुरू झाली आहे. पुढील रब्बी हंगाम साधण्यासाठी सध्या सुगी हंगाम वेळेत आटोपण्याकडे बळीराजाचा कल आहे.
यावर्षी परतीचा पाऊस अति प्रमाणात झाल्यामुळे शिवारात पाणी साचून आहे. त्यामुळे भात पीक आडवे झाले आहे. परिणामी कापणीसाठी अधिक वेळ लागत आहे. वेळेत भात कापणी झाली नाही तर धान्यासह गवताचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.