आप, वायू, तेज, पृथ्वी आणि जल ही पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. मानवी गरजा भागविणाऱया असंख्य वस्तुंच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ही पंचमहाभूते नैसर्गिक भांडवल म्हणून परिचित आहेत. भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये या घटकांना खूप महत्त्व आहे. पृथ्वीवरील सर्व वस्तू या घटकांनी बनलेल्या आहेत. मानवी शरीर आणि त्याला लागणाऱया वस्तू या घटकांनीच बनविलेल्या असतात. म्हणूनच त्यांना नैसर्गिक भांडवल म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे या भांडवलाच्या वापरानंतर त्यांची गुणवत्ता ढासळता कामा नये. ही शाश्वत आणि चिरंतन विकासाची गरज असते. निसर्गाकडून मिळालेल्या घटकांची गुणवत्ता अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. यामध्ये कसूर झाल्यामुळेच हवामान बदलाचे संकट येत आहे. जे टाळता येत नाही. स्थिती, उत्पत्ती आणि लय हय़ा तीन अवस्थांमधून सर्व जीवसृष्टीला जावे लागते. पुढच्या असंख्य पिढय़ांसाठी पंचमहाभूतांचे नैसर्गिक भांडवल वापरात आले पाहिजे. पण दुर्दैवाने या पाचही घटकांची गुणवत्ता ढासळत आहे.
श्वासोच्छवासावर सर्व जीव जगतात. हवा म्हणजे प्राणवायू शिवाय जगता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत हवा, वातावरण आणि सृष्टी प्रदूषित झालेली आहे. यापुढे मास्कशिवाय माणसाला जगता येणार नाही. धूळ, धूर आणि टाकाऊ घन व द्रव पदार्थ जिकडे तिकडे पाहायला मिळतात. त्यामुळे शुद्ध प्राणवायू मिळत नाही. काही शहरामध्ये जिमखान्याच्या धर्तीवर ऑक्सिजन क्लबची निर्मिती झाली आहे. त्याचे तासी रेट चक्रावणारे आहेत. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन सिलेंडरअभावी अनेक कोरोना पेशंट मयत झाले. पूर्वी रस्त्याच्या बाजूला लाजाळू वनस्पती दिसायची. लहान मुले त्याला सतत स्पर्श करायचे आणि मजा करायची. आज ही वनस्पती दिसत नाही. हय़ा वनस्पतीचे अस्तित्व म्हणजे हवा शुद्ध असण्याचे निदर्शक आहे.
सध्या काही घरांमध्ये एअर क्वॉलिटी मॉनिटर ठेवलेले असते. घरातील प्रदूषणाची पातळी त्यामुळे कळते. हवेतील अनेक कणांची माहिती ते देते. धुळीचे प्रमाण, बुरशी, परागीकण, जंतू, तंबाखूचा धूर, काडी कचरा (डेब्रिज), पाळीव जनावरांच्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, बारीक किडे, भुंगे अशा घटकांच्या अस्तित्वाची जाणीव व माहिती अशा मॉनिटरमधून मिळते, असे मॉनिटर पंच व सप्त तारांकित हॉटेल्समध्ये बसविलेले असतात. त्यामध्ये डेटा स्टोरेजची व्यवस्था असते. घरातील हवा शुद्ध करण्यासाठी हे मॉनिटर सतत प्रयत्न करीत असते. डीसी 1100 व डीसी 1700 क्षमतेमध्ये ही उपकरणे उपलब्ध आहेत. दिल्लीसारख्या शहरांची हवेची गुणवत्ता नेहमी कमी होते. सर्वसाधारणपणे 2.5 पेक्षा जास्त माहिती पीएमची हवा नेहमी घातक असते. भारतातील सुमारे 122 शहरातील हवेची गुणवत्ता धोक्मयात असल्याचे जागतिक आरोग्य केंद्राने नमूद केले आहे. सर्वात अधिक गुणवत्ता असलेल्या शहरामध्ये तेजपूर, हासन, चित्तूर, कोलम, पाँडिचेरी, मदुराई, वारांगळ अशा शहरांचा समावेश होतो आणि हवेची गुणवत्ता ढासळलेल्या शहरामध्ये ग्वॉलिअर, अलाहाबाद, पाटणा, रायपूर, दिल्ली यांचा समावेश होतो. शास्त्रीय पद्धतीनेच ही प्रदूषणे दूर केली पाहिजेत. शहरातील झाडांची संख्या त्यांचे नमुने आणि धूळ, धूर, कचरा नियंत्रण व्यवस्थित करणे क्रमप्राप्त ठरते. लिंबाचे झाड हवा शुद्ध ठेवते. अशा अनेक वनस्पती आहेत, जी हवेतील प्रदूषण टाळतात. पूर्वी गावाभोवती चिकांच्या झाडाचे कूंपण असायचे. चिकाचे झाड हवेतील दुर्गंधी शोषून घेते. आता हे चिक क्वचित कुठेतरी पाहायला मिळते.
जल प्रदूषण हे अलीकडे गंभीर होत आहे. विशेषतः नद्या, गटार गंगा बनलेल्या आहेत. शहरातील घन व द्रव कचरा ही एक प्रशासकीय डोकेदुःखी बनलेली आहे. भूपृ÷ावरील आणि भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण झाले आहे. हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेवर जीवसृष्टीचे आरोग्य अवलंबून आहे. ‘समुद्रि चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी स्थिती आहे. पाणी शुद्ध करण्याचे भांडे अथवा पात्र घरी बसवावे लागत आहे. पाणी यापुढे महाग होत जाणार आहे. पाणी ही आर्थिक व सार्वजनिक वस्तू आहे. ज्याचा पुरवठा मर्यादित आहे आणि मागणी प्रचंड वेगाने वाढते आहे. इ. स. 2100 नंतर जगातील अत्यंत जल दुर्भिक्षाचे शहर म्हणून चेन्नई असणार आहे. वर्षाला साधारण 400 लिटर प्रति व्यक्ति पाणी मिळेल, असे भाकित आहे.
इ. स. 2019 मध्ये भारतातील 387 जिल्हय़ातील पाण्यामध्ये नायटेटचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील 70 टक्के पिण्यायोग्य पाण्याचे प्रदूषण होत आहे. पाण्याच्या गुणवंतातील भारताचा क्रमांक 122 राष्ट्रामध्ये 120 वा आहे. म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जेचे आहे. यमुना नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. पंचगंगा, मूळा मुठा या नद्या आता गटारगंगाच बनलेल्या आहेत. यामुळे जैवसृष्टी नष्ट होत आहे. पिकांची गुणवत्ता ढासळत आहे. नद्यांचे पाणी आता कोणीही पित नाही. जलप्रदूषण अनेक रोगांना निमंत्रण देते. सर्वात स्वच्छ नदी म्हणून उमंगॉट (शिलाँगपासून 100 कि. मी. वर मेघालय) ओळखली जाते.
शेतीसाठीच्या पाण्यामुळे आणि रासायनिक खतामुळे क्षारपीडित जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण प्रचंड आहे. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीची शेती लोकप्रिय होत आहे. काही नद्यांच्या पाण्यामध्ये अर्सेनिक घटक असल्यामुळे, त्या पाण्यावर पिकविली जाणारी पिके दूषित होत आहेत. विशेषतः पालेभाज्या व फळे यावर त्याचा परिणाम होत आहे. विशेषतः शहरीकरणामुळे शेती उद्धवस्त होत आहे. दररोज सुमारे 40 दशलक्ष लिटर गटारीचे पाणी नद्यामध्ये मिसळते. यामुळे शेती व सजीवसृष्टीची हानी होत आहे. भारतातील पर्यावरणीय प्रदूषित प्रमाणामुळे वर्षाला 3.75 ट्रिलीयन रुपये अथवा 80 अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारा खर्च वर्षाला सुमारे रु. 470-610 अब्जापर्यंत जात आहे. शिवाय पाण्याचे दुर्भिक्ष, जलनिस्सारण आणि हायजिन यावर होणारे नुकसान प्रचंड आहे. सुमारे चार लाख लोक, पाण्याच्या प्रदूषणाने मरतात आजारी पडल्यामुळे सुमारे 200 मनुष्य दिवस श्रम वाया जात आहे. विशेषतः लहान मुलावर याचा विपरित परिणाम होत आहे. जगातील 1.5 दशलक्ष मुले जलप्रदूषणाने मरतात.
यावर राज्य व केंद्र शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. विशेषतः नागरी भागातील हवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारलीच पाहिजे. त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध आणि नैसर्गिक भांडवलाची जोपासना ही जनमानसामध्ये रुजविली गेली पाहिजे. याचा ऍक्शन प्लॅन जनतेनेच बनविला पाहिजे. आपल्या घरातील कचरा दुसऱयांच्या अंगणात टाकून प्रश्न सुटणार नाही. सुशिक्षित अडाण्यांना शहाणे बनविण्याचे कठीण काम शासन व शासनाच्या संस्थात्मक संरचनेला करावे लागणार आहे.
-डॉ. वसंतराव जुगळे