आयुष्य कोरोनामुळे जास्तच अशाश्वत झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या संपत्तीत मग ती स्थिर असो की अस्थिर ‘नॉमिनी’ नेमणे आवश्यक आहे.
कोणीही आपल्या संपत्तीचे नॉमिनेशन केलेले नसेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसांना प्रॉपर्टीचा ताबा मिळविण्यासाठी अडचणी येऊ शकतात आणि प्रॉपर्टी ताब्यात येण्यास कालावधीही बराच लागतो.
समजा एखाद्याचे बँकेच्या बचत खात्यात किंवा मुदत ठेव खात्यात बरीच मोठी रक्कम आहे व अशा व्यक्तीने नॉमिनेशन केलेले नसेल आणि त्याचे निधन झाले तर अशा प्रकरणात निधन झालेल्याच्या कायदेशीर वारसांना बँकेला वारसाहक्क प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टिफिकेट) द्यावे लागते व हे तात्काळ मिळत नाही. हे मिळण्यासाठी काही महिने लागतात व वकिलांवर खर्च करावा लागतो व या प्रमाणपत्रासाठीचे शुल्क भरावे लागते. हे सर्व जर त्या व्यक्तीने नॉमिनेशन केले असते तर टाळता आले असते. काही ठरावीक मर्यादेपर्यंतची नॉमिनेशन नसलेल्या व मृत झालेल्या खातेदाराची रक्कम शाखाप्रमुख मृताच्या कायदेशीर वारसांना त्याच्या अधिकारांत देऊ शकतो. पण रक्कम जास्त असेल तर मात्र शाखाप्रमुखाला वारसाहक्क प्रमाणपत्र मागवून रक्कम सुपूर्द करावी लागते. नॉमिनीच्या बहुतेक संपत्ती प्रकारात संपत्तीवर अधिकार नसतो. त्याने फक्त संपत्ती ताब्यात घेऊन ती कायदेशीर वारसांना वाटायची असते किंवा त्यांच्याकडे सुपूर्द करावयाची असते.
नॉमिनेशन करणे ही सोपी प्रक्रिया आहे. गुंतवणुकीसाठी जो अर्ज केला जातो त्यात नॉमिनीचा कॉलम असतो. त्यात फक्त नॉमिनीचे नाव, वय, पत्ता व नाते ही माहिती भरून द्यावी लागते. अज्ञान व्यक्तीसही नॉमिनी करता येते. नॉमिनी शक्मयतो विश्वासातला व प्रामाणिक वृत्तीचा तसेच जो कायदा मानतो असा करावा. मालकीच्या सदनिकेचे नॉमिनेशन करण्यासाठी सोसायटीचा यासाठी फॉर्म असतो. तो भरून सोसायटीच्या सेपेटरीला देऊन त्याची पोचपावती घ्यावी. कायदेशीर वारसांपैकी एकास नॉमिनी करणे हेदेखील चांगले असते. नॉमिनीकडून कायदेशीर वारसांनी किती कालावधीत प्रॉपर्टीचा ताबा घ्यायचा याबाबत कायद्यात काहीही तरतूद नाही. कायदेशीर वारसा पुढे न आल्यास नॉमिनी प्रॉपर्टी स्वतःकडे कितीही कालावधी ठेवू शकतो. जर नॉमिनी कायदेशीर वारस असेल व इतर कायदेशीर वारसांनी ‘रिझनेबल टाईम’ (हा शब्द कायद्यात आहे) मध्ये संपत्तीवर दावा केला नाही तर अशा प्रकरणात नॉमिनीकडे संपूर्ण संपत्ती राहू शकते.
नॉमिनेशन करताना स्पेलिंगची चूक होणार नाही हे पहा. स्पेलिंगच्या चुकीची प्रकरणे/खटले न्यायालयात चालू आहेत. नॉमिनीच्या केवायसी कागदपत्रात जसे नाव आहे तसेच नॉमिनेशन फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे भविष्यात प्रक्रिया सुरळीत होण्यात अडचणी येणार नाहीत. एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर प्रत्येकाचा संपत्तीत किती टक्के हिस्सा हे नमूद करावे. हे नमूद नसल्यास यावरून नॉमिनींना कोर्टात जावे लागेल. नॉमिनी व्यक्ती जर अज्ञान असेल तर सज्ञान व्यक्तीचे नाव गार्डियन (पालक) म्हणून नमूद करावे लागते. कायमचे परदेशी अस्तित्वात असलेल्या नातलगाचे नाव नॉमिनी म्हणून देऊ नका. त्याला तर संपत्तीमालकाच्या मृत्यूनंतर तात्काळ भारतात येणे जमले नाही तर प्रक्रिया लांबू शकते.
संपत्तीमालक पहिल्यांदा दिलेला नॉमिनी त्याला वाटेल तेव्हा बदलूही शकतो. कित्येक जण फॉर्म भरताना त्यावेळेला लक्षात आलेले किंवा सूचलेले नाव नॉमिनी म्हणून देतात व नंतर कोणाचे नाव दिले आहे हे विसरून जातात. त्यामुळे प्रत्येकाने संपत्तीचा प्रकार त्यासाठी दिलेला नॉमिनी याचा तपशील डायरीत लिहावा/रेकॉर्ड करावा व वर्षातून एकदा तो पुन्हा डोळय़ांखालून घालावा. नॉमिनीचाच मृत्यू झाला किंवा त्याच्याशी संबंध ताणले गेले तर लवकरात लवकर नव्याने नामांकन करावे. नॉमिनीची नोंद असेल तर बँका व विमा कंपन्या (जीवन विमा कंपन्या) मृत व्यक्तीची सर्व रक्कम वारसाहक्क प्रमाणपत्र न मागता नॉमिनीकडे सुपूर्द करतात.
जीवन विमा कायद्यात 2015 साली एक तरतूद करण्यात आली आहे. (इन्शुरन्स लॉज अमेंडमेंट ऍक्ट 2015) यानुसार जर पालक, पती किंवा पत्नी, स्वतःची मुलगे/मुली अशांपैकी कोणी नॉमिनी असेल तर अशा नॉमिनीला कायद्याच्या भाषेत बेनिफिशिअल नॉमिनी म्हणून ग्राहय़ मानून दाव्याची सर्व रक्कम दिली जाते. कायदेशीर वारस दाव्याच्या रकमेवर हक्क सांगू शकत नाहीत. जर नॉमिनीच मृत झाला असेल तर कायदेशीर वारस हक्क सांगू शकतील. जीवन विमा पॉलिसीत नॉमिनी नोंद नसेल, नॉमिनी वारला असेल व नॉमिनीने दावा केल्यानंतर दावा संमत होण्याच्या कालावधीत नॉमिनी वारसा असेल तरच कायदेशीर वारस दावा करू शकतो. एखाद्याला एकाहून अधिक अपत्ये आहेत व त्यापैकी एक अपत्य नॉमिनी आहे अशावेळी विमा कंपनी जे अपत्य नॉमिनी आहे त्या अपत्यालाच दाव्याची रक्कम देणार.सर्वांनीच विशेषतः वरि÷ नागरिकांनी सर्व संपत्तीचे स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणाच्याही दबावाखाली न येता नामांकन करावे. म्हणजे स्वर्गातून आपली मुले, पत्नी भूतलावर कोर्टकचेरी करीत आहेत, हे चित्र पहावे लागणार नाही!
– शशांक मो. गुळगुळे