प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंगलमुर्ती फळबाग संघ व फ्रुट सप्लायर्सचे संस्थापक पंढरीनाथ नागणे यांच्या पुढाकाराने काश्मिर व हिमाचल प्रदेशमधील सफरचंद चक्क आटपाडीच्या सौदे बाजारात दाखल होत आहेत. सांगली वगळता अन्यत्र नसलेली ही सोय आटपाडीसारख्या ग्रामीण भागात उपलब्ध झाल्याने थेट बर्फाळ प्रदेशातील बागेतून सफरचंद ग्राहकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे.
डाळिंबाचे माहेरघर बनलेल्या आटपाडीमध्ये काही वर्षांपूर्वी बाजार समितीमध्ये सौदे बाजार सुरू झाला. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांनी आटपाडीकडे मोर्चा वळविला. बागेतुन थेट परदेशापर्यंत येथील डाळींबानी मजल मारली. सौदे बाजाराचा डाळींब उत्पादकांना चांगला लाभ झाला. पण, देशभरात विक्रीमध्ये अवल्ल असलेले सफरचंद आटपाडीच्या सौदे बाजारात आणुन त्याचा लिलाव करून स्थानिक लोकांना कमी दरात मिळण्याची सोय करण्याची अफलातुन किमया पंढरीनाथ या व्यवतीमत्त्वाने घडविली.
फक्त मोठ्या शहरातच सफरचंद आणून तेथील व्यापाऱ्यांसाठी लिलावाची सोय आहे. पण, आटपाडीच्या सौदे बाजारात श्रीनगर, सिमला, रोडो, कुलु-मनाली येथुन सफरचंद आणून ते येथील व्यापाऱ्यांना, लोकांना उपलब्ध करण्यात पंढरीनाथ नागणे यांना यश आले.
सहजरित्या कमी दरात उपलब्ध होत असलेल्या सफरचंद खरेदीसाठी अनेकांनी आपला मोर्चा आटपाडीकडे वळविला आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यात आटपाडीतून सफरचंद पोहचताहेत. कोरोनाच्या संकट कालावधीत फळे खाण्याचे प्रमाण वाढले आहे. सफरचंदाचे दरही अधिक आहेत. पण, आटपाडीत सौदे बाजार सुरू झाल्याने दरात फरक पडून कमी दराने सरपचंद उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागात डाळिंब पोहचविणारे पंढरीनाथ नागणे यांनी देशातील सफरचंदही आटपाडीत आणून येथून सर्वत्र पुरविण्याची सुरू केलेली सोय सध्या बाजार समितीसह आटपाडी तालुक्याचा लौकिक वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.