उपायुक्त धनराज पांडे यांचा अजब कारभार; रूग्णांच्या उर्वरित 9 लाख 98 हजार रूपयेचे काय ?
सोलापूर / प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या कोविड-19 कंट्रोल रूम मार्फत उपायुक्त धनराज पांडे यांनी नर्मदा हॉस्पिटलला कोविड रुग्णांचे जादा घेतलेले 14 लाख 98 हजार 889 रूपये परत करण्याची नोटीस दिली. परंतु माहिन्याभरानंतर फक्त 5 लाख 540 रूपये परत केले आहेत. त्यामुळे उपायुक्त पांडे यांचा अजब कारभार समोर आला असून उर्वरीत 9 लाख 98 हजार 349 रूपयेचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या कोविड-19 कंट्रोल रूम मार्फत खासगी रुग्णालयातील कोरोना रूग्णांवरील झालेल्या खर्चाचे लेखा परीक्षण करण्याकरिता उपायुक्त धनराज पांडे हे सनियंत्रण अधिकारी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी नेमले आहेत. नर्मदा हॉस्पिटल मधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या बिलांचे लेखा परीक्षक म्हणून सर्फराज मोमीन व अश्विनझिंजुरे व विष्णु गाडे यांनी यांची नेमणूक केली होती. त्यांनी येथील बिलांचे सप्टेंबर 2020 मध्ये लेखा परीक्षण केले. त्यावेळी बिलामध्ये तफावत आढळल्याने उपायुक्त धनराज पांडे यांनी नर्मदा हॉस्पिटलला 18 सप्टेंबर 2020 रोजी नोटीस काढली. या नोटीस मध्ये 80 रूग्णांचे 14 लाख 98 हजार 889 रूपये जादा आकारले असून ती रक्कम संबंधीत रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकास परत करावी.
सदरचा अहवाल 2 दिवसात कोविड-19 नियंत्रण कक्षास सादर करावा. अन्यथा आपणावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटीस मध्ये म्हटले होते. परंतु तब्बल एक महिन्यानंतर 80 रूग्णांचे 14 लाख 98 हजार 889 रूपये परत करण्याऐजवी फक्त 43 रुग्णांचे 5 लाख 540 रूपये इतकीच रक्कम परत केली आहे. त्यामुळे उर्वरित 37 रूग्णांचे 9 लाख 98 हजार 349 रूपयेचे नेमके काय झाले ? असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
फक्त 5 लाख रूपयेच वाटप करायचे होते
-नर्मदा हॉस्पिटलकडून रूग्णांचे जादा पैसे वसूल केले होते. याबाबत आम्ही पुन्हा एखदा ऑडीट केले. त्यानुसार 43 रूग्णांचे 5 लाख 540 रूपये चेक द्वारे परत केले. फक्त 5 लाख 540 रूपये वाटप करायचे होते.
-धनराज पांडे, उपायुक्त तथा सनियंत्रण अधिकारी, कोविड-19
9 लाख 98 हजार रूपयेचे गौडबंगाल काय ?
-नर्मदा हॉस्पिटलमधील एकाही रुग्णाची बिलाबाबत तक्रार आली नाही. यावरूनच येथील बिलांचे ऑडिट व फेरऑडीट उपायुक्त धनराज पांडे यांच्या आदेशानुसार लेखा परीक्षक सर्फराज मोमीन, अश्विन झिंजुरे व विष्णु गाडे यांनी केले. ज्यामध्ये 37 रूग्णांचे व 9 लाख 98 हजार 349 रूपयेचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे याचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.