जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ाचा रेड झोनमध्ये समावेश झाला आहे. यामध्ये सातारा व कराड दोन ठिकाणी बाधित वाढत असल्याने दोन्ही शहरासह परिसरातील उपनगरे कंटेटमेंट एरिया घोषित करुन तिथे 100 लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. काही अडचणी या काळात नागरिकांना येत असल्या तरी त्यावर प्रशासनाकडून उपाय योजनाही सुरु आहेत. भविष्यात मोठा त्रास होण्यापेक्षा सध्या नागरिकांना थोडासा त्रास होत आहे हे मान्य आहे. मात्र परिस्थितीनुरुप येत्या काही दिवसात त्यात बदल होत जातील. नो कंटेन्टमेंट झोनची पुर्नरचना करणार असून अशा भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु होण्याबरोबरच आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी साहित्य, बियाणे विक्री केंद्रे सुरु केली जातील. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हे प्रभावी माध्यम आहे. प्रशासन केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार काम करत असून नागरिकांनी काही दिवस सहकार्याची भूमिका ठेवण्याची गरज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केली.
जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बाधित 80 असून, 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत, 2 बळी गेले आहेत. तर आजच्या घडीला सुमारे 3,000 लोक संस्थात्मक व होम क्वारान्टीन मध्ये आहेत. यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून अफवाही पसरत असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा प्रशासन, राज्य शासन व केंद्र शासन यांची सातारा जिह्या संदर्भात भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पत्रकारांनी विविध प्रश्न मांडल्यानंतर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आपतकालीन स्थिती ज्या गाईडलाईन्स केंद्र व राज्य शासनाकडून जारी करण्यात आल्यात त्या जिल्हय़ातील परिस्थितीनुसार प्रशासन राबवत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने आता पुढील काळ चांगला येण्यासाठी आताच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळेच सातारा व कराड येथे सध्या तरी अत्यावश्यक गोष्टी नागरिकांना मिळण्यासाठी सवलत देण्याव्यतिरिक्त काहीही सुरु होणार नाही.
शहरी कंटेन्मेंट व ग्रामीण कंटेन्मेंट दोन्ही प्रकारात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी कटिबध्द असून त्या त्या विभागातील प्रांताधिकाऱयांना त्याबाबत व्यवस्था निर्माण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. जसजशी परिस्थिती समोर येईल तशा पध्दतीने संसर्ग रोखून संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्हय़ातील नागरिकांकडून प्रशासनाला चांगले सहकार्य लाभत आहे. यावेळी पत्रकारांनी सामान्य माणसांचे विविध प्रश्न मांडले यासह विविध प्रश्नांना जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी उत्तरे दिली. काळाबाजार करणाऱयांवर कडक कारवाईचा इशारा सिंह यांनी दिला तर प्रशासनातील काही त्रुटीबाबतही त्यांनी दखल घेत यंत्रणा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
जीवनावश्यक वस्तू दुकाने वगळता सर्व बंद
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंदच राहणार आहेत. सध्या तरी सातारा व कराड येथील अत्यावश्यक सेवा वगळता काहीही शिथील होणार नाही. ज्या तालुक्यात रुग्ण आढळून आलेले नाहीत तिथे काही प्रमाणात शिथीलता देण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. लवकरच खरीप हंगाम येणार असल्याने त्यासाठी शेतीविषयक दुकाने, ट्रक्टर दुरुस्ती, विक्री, सोशल डिस्टन्स पाळून किराणा तसेच घरपोच भाजी विक्री सुरु होईल. काही कंटेन्मेंट एरियात घरपोच किराणा तसेच भाजी, दूध विक्री सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जो परिसर कंटेन्टमेंट झोन तेथे निर्बंध
ज्या परिसरात कोरोना बाधित आढळून आलेत तिथे तसेच जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आलेल्या सातारा व कराडसह जो परिसर कंटेन्टमेंट झोन आहे तिथे निर्बंध जारीच राहतील. कारण काळजी वाढवण्यापेक्षा काळजी घेणे अधिक हितकारक ठरेल. त्यातही पाटणमध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे तर जावलीतील काही गावांसह मेढा व 21 गावांमध्ये घरपोच अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आलीय. यापैकी काही भागात आलेल्या मुंबईकरांमुळे परिस्थिती नियंत्रणात येईंपर्यंत निर्बंध सुरुच राहतील. हळूहळू त्यात शिथीलता येईल.
दारु दुकानांना परवानगी मिळाली तरी सध्या नाही
काही दिवसात दारूची दुकाने उघडण्याबाबत विचार करत आहोत. केंद्र व राज्य शासनाकडून त्याबाबत सूचना आल्या असल्या तरी जिल्हय़ातील रेड झोनची परिस्थिती पाहता पुढील काही दिवसात यावर निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे दारु दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी जिल्हय़ातील स्थिती जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत निर्णय नाही. स्थिती सुधारत आहे असे वाटल्यास येत्या काही दिवसात सामाजिक अंतर राखून जे काही व्यवहार सुरु करता येतील ते सुरु होतील.
मुंबई पुण्याहून येणाऱया लोकांना अद्याप परवानगी नाही
जिल्हय़ात पुणे व मुंबईहून साताऱयात काही लोक येत आहेत. यामध्ये कोणी गरीब आला की लगेच कारवाई होत असली तर काही श्रीमतांच्या इमल्यात अनेक दुसऱया जिल्हय़ातील पासिंगच्या गाडय़ा आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी मुंबई, पुण्याहून येवू इच्छिणाऱया लोकांनी तेथील प्रशासनाकडून परवानगी घ्यायची आहे व जिल्हय़ातून दुसरीकडे जावू इच्छित असलेल्यांना जिल्हा प्रशासन परवानगी देणार आहे. त्यामुळे सध्या मुंबई व पुणेकरांना अजिबात प्रवेश नसल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
9 चेक पोस्टवरुनच प्रवेशाची परवानगी
सध्या जिल्हाबंदी आदेश लागूच असून काही प्रमाणात नव्हे तर तब्बल 3 लाखाच्या आसपास बाहेरुन जिल्हय़ात आले आहेत. त्यांची नोंदणी झालेली असून त्यांचा सर्व्हेही आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. यापुढे परवानगीशिवाय कोठूनही कोठे जात येणार नाही. जिल्हय़ातील सीमा सील करण्यात आलेल्याच असून फक्त 9 चेकपोस्ट वरुन नोंद झाल्यानंतर जिल्हयात प्रवेश करता येणार आहे. तिथे कडक निर्बंध घालण्यात आलेले असून परवानगीशिवाय कोणीही जिल्हय़ात प्रवेश करु शकणार नाही. बाहेरून येणाऱयांची संख्या वाढल्यावर त्यांना होम कोरंन्टाईन केले जाणार, एवढया लोकांना सांभाळणे शक्य नाही.
कंटेमनेट झोन शिवाय अन्य भागात टप्या टप्याने शिथिलता
जेथे रूग्ण सापडला तो परिसर वगळता इतर भागात शिथीलता देण्याचा विचार सुरु आहे. एखाद्या परिसरात रुग्ण सापडल्यानंतर 1 कि. मी., 3 कि. मी. व 5 कि. मी. परिसर कंटेन्टमेंट एरिया जाहीर केला जातो. पुढील काळात नागरिकांची गैरसोय होवू यासाठी मायक्रो कंटेन्टमेंट एरिया म्हणजे ज्या भागात रुग्ण सापडेल तो सर्व भागाच सील केला जाईल. त्याच्या इतर भागातील व्यवहार योग्य ती काळजी घेवून सुरु ठेवण्यात येतील. ज्या भागात कोरोना रुग्ण सापडला आहे तो भाग कंटेन्मेंट झोन राहणारच आहे. पण त्या शिवाय इतर भागात सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पण त्यासाठी विविध टप्पे ठरवण्यात आले आहेत.
औद्योगिक वसाहतीबाबत प्राधान्याने विचार
सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे जिह्यात फक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक दुकानेच उघडली जाणार आहेत. अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. अन्य दुकाने व स्थापना या टप्प्या-टप्प्याने उघडली जाण्याची व्यवस्था केली जात आहे. सातारा व कराड येथील औद्योगिक वसाहत सुमारे पूर्ण बंद आहे. याला गती देण्यासाठी प्राधान्याने विचार करत आहोत. याचा आढावा घेण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. त्या त्वरित चालना देताना बंधने कशी पाळली जातील. सूचनांची अंमलबजावणी कशी करता येईल याला आता प्राधान्य देत आहोत.