ग्रा.पं.निवडणुकीत पराभूत झाल्यानेच करताहेत अनेक आरोप : हंदिगनूर न्यायदान पंच कमिटीची माहिती : नागरिकांची दिशाभूल
प्रतिनिधी / बेळगाव
हंदिगनूर येथील न्यायदान कमिटीवर आरोप करण्यात आल्यासंबंधी बैठक नुकतीच बोलाविण्यात आली होती. काहींनी गावातील न्यायदान समिती बरखास्त करावी, अशी मागणी निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी केल्यामुळे ही बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, बैठकीला निवडणुकीत पराभूत झालेले कोणीच आले नसल्याने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. गावात वितुष्ट निर्माण न करता शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
हंदिगनूर येथील महालक्ष्मी मंदिर येथे यासंबंधीची बैठक बोलाविण्यात आली होती. संबंधितांनी आमदार जारकीहोळी यांना निवेदन दिल्याचे सांगण्यात आल्याचे भाष्यही केले होते. त्यामुळे आमदारांचे प्रतिनिधी म्हणून जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, केपीसीसीचे सदस्य मलगौडा पाटील यांनाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यांनीही उपस्थिती दर्शविली. ग्राम पंचायत अध्यक्ष सुरेश जाधव उपस्थित होते.
ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर नागरिकांची दिशाभूल व विकासकामात अडथळे निर्माण करणाऱयांनाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या बैठकीला अनुपस्थिती दर्शविली. वारंवार ते न्यायदान कमिटीबाबत अफवा पसरवत आहेत. बैठकीदरम्यान अनुपस्थित असणाऱया व्यक्तींना फोनवरून मलगौडा पाटील यांनी संपर्क साधला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बैठकीला उपस्थित असणाऱयांनीच अंतिम निर्णय घेतला.
यावेळी या बैठकीत न्यायदान कमिटी ही अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. गावच्या विकासासाठी त्यांनी अनेक कार्ये केली आहेत. गावातील भांडण असो किंवा इतर समस्या निवारण्यासाठी ही कमिटी सदैव पुढे राहिली आहे. देवस्कीची कामेही करण्यासाठी ही कमिटी धडपडत असते. अनेक जबाबदाऱया निभावूनही काहींनी दिशाभूल करून न्यायदान कमिटीबाबत नको त्या अफवा परसविल्या आहेत. तेव्हा ही कमिटी कार्यरत राहणार असून यामध्ये काही बदल करायचा असल्यास तो गावासमक्ष करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
दिशाभूल करून गावचे नाव बदनाम करणाऱयांचा यावेळी निषेधही नोंदविण्यात आला. याचबरोबर ग्राम पंचायतीला विश्वासात न घेता कोणतेही काम करण्यात येत नाही. मात्र, काहींनी ग्राम पंचायतीचाही अवमान केला आहे. काही जण गावातील शांततेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करत असून यापुढे तरी त्यांनी सहकार्य करावे, असेही बैठकीत ठरविण्यात आले.
गावच्या विकासकामात वारंवार अडथळे आणणाऱयांनी यापुढे तरी विकासाला चालना द्यावी, असे आवाहन करण्यात आले. विकास करायचा नसेल तर अडथळे तरी आणू नयेत, असे ठरविण्यात आले.
न्यायदान कमिटी लोकहितार्थ
न्यायदान कमिटीने कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार केला नसून लोकहितार्थ कार्य केले आहे. याबाबत अनेकांना माहिती नसूनही त्यांची नावे यामध्ये गोवण्यात आली असून संबंधितांनी अशा भानगडी करणे सोडून द्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. दरम्यान, काही नागरिकांना न सांगताच संबंधित तक्रारीवर सह्या व नावे घेऊन त्यांची दिशाभूल करीत असून अशांवर कारवाई करावी, अशी मागणीही संबंधित नागरिकांनी केली आहे.