प्रतिनिधी/ बेळगाव
न्यायमूर्ती ए. जी. सदाशिव आयोग लागु करावा, याचबरोबर दलितांवर होणारे अन्याय दूर करावेत, या मागणीसाठी जिह्यातील दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. यावेळी सदाशिव आयोग लागु करा आणि दलितांसह इतर गरिबांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
जिह्यातील विविध भागांतून दलित संघटनेचे कार्यकर्ते आणि महिला मोठय़ा संख्येने आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी देऊन प्रादेशिक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. न्यायमूर्ती ए. जी. सदाशिव यांनी अनुसुचित जाती-जमातीला न्याय मिळावा यासाठी 24 सप्टेंबर 2005 ला आयोग लागू करावा, असे सरकारला सांगितले होते. याबाबत आयोग तयार करून त्यांनी सरकारकडे दिला होता. मात्र जवळपास 15 वर्षे उलटली तरी अजूनही सरकार त्याबाबत गांभीर्य घेण्यास तयार नाही.
भाजप सरकारने दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी या निवेदनात करण्यात आला. रायचूर जिह्यातील सिध्दनूर तालुक्मयामध्ये यल्लेकोडगी या गावामधील एका दलित कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला आहे. अशाप्रकारे अजूनही दलितांवर अन्याय होत आहे. तेंव्हा आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत कंद्रोळी, हणमंताप्पा हपनाळ, यल्लाप्पा हंद्राळ, चंद्रा हाविण्णावर, रविंद्र माळवी, बसवराज मुडलगी, मरिअप्पा पुजारी, दुर्गाप्पा हडगीबाळ, श्रीकांत मादर, यशवंत सागर, नरेश हरिजन यांच्यासह दलित संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते..