एलआयसीत नोकरी लागली तेव्हा कॉलेजचे तिसरे वर्ष चालू होते. शेवटचा तास बुडवून धावतपळत ऑफिसात पोचायचो आणि कॅण्टीनमध्ये जाऊन घाईघाईने उपमा, ब्रेड ऑम्लेट खाऊन कामाला लागायचो. जेवणाच्या सुट्टीत स्वस्त आणि मस्त राईस प्लेट.
ऑफिस सुटल्यावर वाळिंबे नावाच्या मित्राबरोबर कॅफे डिलाईटमध्ये भ्रष्टाचार, (हो, हो तेव्हाही होताच), युनियनच्या भानगडी, हिंदुत्ववाद, कम्युनिझम, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य वगैरेवर पोकळ चर्चा करीत पडिक असणे ही शारीरिक आणि बौद्धिक सुखाची परमावधी वाटे. वाळिंबेने मला रसिकतेने जगायला शिकवले. त्याच्या सहवासात माझ्या न्याहारीविश्वाचे क्षितिज प्रचंड विस्तारले.
रविवारी सकाळी आम्ही दोघे डिलाईटमध्ये बसायचो. उपमा, चटणी आणि तळलेला पापड मागवायचो. पोहे मागवले तर त्याबरोबर (एक्स्ट्रा चार्ज देऊन) तळलेला पापड, चटणी आणि सांबारच्या वाटय़ा मागवायचो. वाळिंबेमुळे मला जिभेचे चोचले पुरवण्याचे अनेक प्रकार समजले. लंच अवरमध्ये आम्ही रेल्वे स्टेशनजवळच्या कॅफे पार्कमध्ये जायचो. बन-मस्का मी पहिल्यांदा तिथेच चाखला. बनपावावर सुरी फिरवून त्या भेगांमध्ये मस्का चोपडलेला असे. ‘बन-मस्का शक्कर मार के’ म्हटल्यावर वेटर मस्क्मयावर साखरदेखील पेरून द्यायचा. त्यानंतर लाईट चहा घेतला की पोटोबा तृप्त होई. वाळिंबेबरोबर त्या काळात शहर पालथे घातले. ‘ब्रेड-ऑम्लेट’ला काही इराणी हॉटेल्समध्ये ‘बैदा-ऑम्लेट’ म्हणत. उकडलेल्या अंडय़ांसह टोमॅटो सॉस देत. ऐंशीच्या दशकात फडतरे चौकातल्या स्वीट हाऊसमध्ये इडली प्लेट मागितली की एक भक्कम लठ्ठ इडली, त्यावर कांदा-लसूण मसाल्याची फोडणी दिलेले तुरीचे तिखटजाळ घट्ट वरण आणि तोंडी लावायला जाड शेव दिली जाई. या काळात चाखलेल्या असंख्य मिसळी हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. न्याहारी नेहमीच हॉटेलात होई असे नाही. क्वचित घरी फोडणीची पोळी ऊर्फ पोळीचा चिवडा होई. त्याबरोबर बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि फरसाण घेतले तर त्या पदार्थाची चव बहुगुणित होते हा शोध त्याच काळात लागला. न्याहारीची एक चमत्कारिक आठवण आहे. आजोबांचे निधन झाले तेव्हा अस्थी विसर्जनासाठी भल्या पहाटे निघून आळंदीला गेलो होतो. सर्व विधी पार पडेतो नऊ वाजून गेले. भूक लागल्यामुळे समोर दिसलेल्या उपाहारगृहात शिरलो. तिथे ‘बटाटेवडा सँपल’ नावाचा एकच पदार्थ होता. मोठय़ा वाडग्यात मटकीचा लालबुंद तिखट रस्सा आणि मध्यभागी एक आडदांड बटाटेवडा. मघाशी आजोबांच्या आठवणींनी डोळय़ात पाणी आले होते. आता त्या तिखट चवीने नाकाडोळय़ांतून पाणी आले. निमिषभर दु:ख विसरल्यासारखे झाले. पण निमिषभरच.