प्रतिनिधी/ बेळगाव :
घरपट्टी भरण्यास मुदत देण्यात आली आहे. तरीदेखील काही नागरिक घरपट्टी भरण्यासाठी चलन घेत आहेत. मात्र, 25 टक्के करवाढीप्रमाणेच चलन देण्यात येत आहे. याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने घरपट्टी भरायची की नाही, याबाबत मालमत्ताधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दर तीन वर्षांनी घरपट्टीत वाढ करण्यात येते. महापालिका कायद्यानुसार तीन वर्षांनी घरपट्टी वाढ करणे बंधनकारक आहे. त्यामुळे 2020-21 च्या आर्थिक वर्षापासून 15 टक्क्मयाने घरपट्टी वाढ करण्यात आली आहे. घरपट्टी वाढीच्या ठरावाला मनपा प्रशासकांच्या मंजुरीनंतर घरपट्टी वाढ करण्यात आली आहे. एप्रिलपासून वाढीव घरपट्टी वसूल करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. पण 15 टक्के करवाढ झाली असताना 25 टक्क्मयांप्रमाणे घरपट्टी वसूल करण्याचा सपाटा मनपा प्रशासनाने चालविला आहे. यंदा स्वच्छता शुल्कात वाढ करण्यात आली असून, याचा आर्थिक भुर्दंड वाढला आहे. एप्रिल महिन्यात 5 टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे बहुतांश नागरिक सवलत मिळविण्यासाठी एप्रिल महिन्यात कर भरणा करतात. काही नागरिकांनी घरपट्टी भरण्यासाठी चलन घेतले असता घरपट्टीत 25 टक्के वाढ करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील बहुतांश मालमत्ताधारकांना 25 टक्के वाढ करून चलन देण्यात आले आहे. 15 टक्के वाढ असताना 25 टक्केप्रमाणे चलन देण्यात येत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. महागाई, महामारी, पूर परिस्थिती अशा विविध समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना घरपट्टी वाढीचा फटका बसला आहे. वास्तविक पाहता वर्षभरात निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करून घरपट्टी वाढ रद्द करणे आवश्यक होते. त्याकरिता नागरिकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 15 ऐवजी 25 टक्केप्रमाणे वाढीव चलन देण्यात येत असल्याने घरपट्टीचा आकडा वाढला आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन झालेल्या चुकीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.