वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार
वार्ताहर/ मडकई
बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक यांचे कार्य उल्लेखनीय असून आगामी पंचायत निवडणुकीत असे उमेदवारच पंचसदस्य म्हणून निवडून आणण्याची गरज आहे. पंचसदस्यांनी जनतेची कामे सेवा या भावनेने केल्यास समाज त्याची कायम दखल घेत असतो. बांदोडा पंचायतीकडे असलेला रु. 1 कोटी 22 लाखांचा निधी ही जमेची बाजू आहे. मोठी आस्थापने व शिक्षणसंस्थांकडून कर जमा करून पंचायत निधी वाढवण्याचे आवाहन विजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
बांदोडा पंचायतीतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार तथा नाटय़कलाकार जगन्नाथ मुळवी व अग्निशामक दलाचे सचिन कुर्पासकर यांचा सत्कार सोहळा तसेच महिला मंडळ, देवस्थान, चर्च, मशीद व क्लबसाठी साहित्य वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कवळे जिल्हा पंचायतसदस्य गणपत नाईक, सरपंच राजेश नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य अजय नाईक, वामन नाईक, साईशा नाईक, कविता नाईक, सत्कारमूर्ती पत्रकार जगन्नाथ मुळवी, अग्नीशामक दलाचे सचिन नाईक, फोंडा गटाधिकारी आश्विन देसाई, ग्रामीण विकास समीतीचे ऍड. सुरेल तिळवे व हेमंत गावंस व्यासपिठावर उपस्थित होते.
राजेश नाईक म्हणाले, सरपंच पदाच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात झालेला विकास नागरिकांनी पाहिला आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्प, नैसर्गिक जलस्रोत, नाले, विहिरी, सीसीटीव्ही कॅमेरे, पंचायत इमारतीचे नूतनीकरण अशी एकूण रु. 85 लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीचा त्यासाठी वापर करण्यात आला असून सहा महिन्यांपूर्वी त्यासाठी नियोजन केले होते. पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अजून विकासकामे हाती घेण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.
पत्रकार जगन्नाथ मुळवी यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘तरूण भारत’मधून दुर्बल व दुबळय़ा घटकांवर आपण लिहिले. त्यांच्या व्यथेची संग्रहीत कात्रणे एकत्रीत करून ‘स्पर्श स्पंदन’ हे पुस्तक बांदोडा पंचायतीने 2009 साली प्रकाशिक करून तत्कालीन सरपंच दिनेश नाईक व पंचायत मंडळाने आपल्या कार्याची दखल घेतली होती.
पत्रकार जगन्नाथ मुळवी व सचिन कुर्पासकर यांना शाल श्रीफळ व श्री गणेशाची प्रतिमा देऊन मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. बांदोडा पंचायत क्षेत्रातील 55 महिला मंडळांना खुर्च्या, 33 देवस्थाने तसेच चर्च मशीद व 27 क्लबांना क्रीडा साहित्य वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी गावडे यांनी तर साईशा नाईक यांनी आभार व्यक्त केले.