ऑनलाइन टीम / मुंबई :
दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोना विरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा, असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.
रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, दिव्या च्या माध्यमातून देशाला कोरोना विरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. असे असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवून एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करू, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधत 5 एप्रिल रोजी नऊ वाजता घरातील सर्व लाईट बंद करा आणि बाल्कनीमध्ये येऊन नऊ मिनिट मेणबत्ती, टॉर्च लावा. आणि आपली एकत्रित ताकत दाखवून द्या असे आवाहन केले आहे.