कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर साधणार संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी परवा गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना दिशानिर्देश यापूर्वीच दिले आहेत. मात्र, कोरोना युद्धात सर्व राज्यांमध्ये सुसूत्रता असणे आवश्यक आहे. यासाठी चर्चेचे आयोजन आहे.
17 मार्चला अशी चर्चा झाली होती. कोरोना नियमांचे कठोर पालन करण्याच्या दृष्टीने प्रशासनांनी सज्जता करावी. स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी आणि कोरोना कक्ष स्थापन करावेत. लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न करावा, अशा अनेक सूचना केंद्राने केल्या असून अनेक राज्यांनी स्थानिक निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे.
पाच सूत्री कार्यक्रम
चाचणी, पाठपुरावा, उपचार, कोरोना नियंत्रणाला अनुकूल वर्तणूक आणि लसीकरण असा पाच सूत्री कार्यक्रम केंद्राने राज्यांना दिला आहे. याच कार्यक्रमावर गुरुवारच्या चर्चेत विचार केला जाईल अशी शक्यता आहे. सध्या नव्याने आढळणाऱया रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण आठ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये स्थिती विशेष चिंताजनक आहे. अशा स्थितीत राज्यांनी केंद्राशी संपर्कात राहून सतर्कतेने स्थिती हाताळावी असा सल्ला केंद्राने दिला आहे.
विशेष मोहीम हाती घेणार कोरोना नियंत्रणासाठी अनुकूल अशा वर्तणुकीचा लोकांनी स्वीकार करावा, यासंबंधी प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. 100 टक्के लोकांनी मास्कचा उपयोग नेहमी करावा, शारिरीक अंतर राखावे, एकाच ठिकाणी गर्दी करू नये, अनावश्यक फिरणे टाळावे आदी सूचना आरोग्य तज्ञांनी दिल्या आहेत. तसेच लसींसंबंधी अनाठायी भीती बाळगू नये, असेही वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र लोक आजही निष्काळजी आणि बेदरकार आहेत. त्यामुळे हा प्रबोधन कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे