कर्नाटकातील श्रृंगेरी मठ पुरोहितांकडून पूजन, नंतर सर्वधर्म प्रार्थना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या नूतन संसद वास्तूचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. गुरूवारी कर्नाटकातील श्रृंगेरी मठाच्या पुरोहितांनी धार्मिक कृत्ये व मंत्रोच्चाराच्या गजरात हे पूजन केले. नंतर सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजनही करण्यात आले होते. नव्या संसदेची वास्तू 64 हजार 500 चौरस फूट क्षेत्रफळाची असून ती 2022 पर्यंत साकारणार आहे. भूमीपूजनासमवेतच नूतन वास्तूची कोनशीलाही स्थापन करण्यात आली आहे. नूतन संसद वास्तू ही भारताच्या आत्मनिर्भरतेचा कळसाध्याय आहे, असे उद्गार या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत, तर हरदीप पुरी यांचे प्रमुख भाषणही झाले.
या ऐतिहासिक प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, केद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश, टाटा विश्वस्त निधी संस्थेचे रतन टाटा तसेच विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या वास्तूच्या निर्मितीचे उत्तरदायित्व टाटा समूहकडे सोपविण्यात आले आहे, अशी माहितीही देण्यात आली.
विस्तारीत व्यवस्था
नव्या लोकसभागृहात 888 खासदारांची सोय असून ही संख्या 1,224 पर्यंत वाढविली जाऊ शकते. तर नव्या राज्यसभागृहात 384 खासदारांची व्यवस्था होणार आहे. सध्या लोकसभेची सदस्यसंख्या नामनिर्दिष्ट सदस्य धरून 545 तर राज्यसभार सदस्यांची संख्या 245 आहे. नूतन संसद वास्तूवर 971 कोटी रूपये व्यतीत केले जाणार असून अत्याधुनिक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
ऐतिहासिक क्षण
हा देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. संसदेच्या जुन्या वास्तूने स्वातंत्र्योत्तर काळात देशाला दिशा दिली. तर नूतन संसद वास्तू आत्मनिर्भर भारताची साक्षीदार असेल, असे उद्गार भूमीपूजनानंतर पंतप्रधान मोदी यांनी काढले. नवी वास्तू अत्याधुनिक व्यवस्थेने युक्त असेल. त्यामुळे खासदारांची कार्यक्षमता वाढणार आहे. ही वास्तू साऱया भारतासाठी प्रोत्साहन देणार असेल, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
जुनी वास्तू अन्य कामांसाठी
नूतन वास्तू पूर्ण झाल्यानंतर जुनी वास्तूही उपयोगात राहणार आहे. ती अन्य संसदीय कामांसाठी, तसेच सरकारी कामकाजांसाठी उपयोगात आणली जाईल. त्यासाठी वास्तूत आवश्यक ते परिवर्तन केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.