मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहिती ; पंतप्रधानांच्या निर्देशाची प्रतीक्षा
प्रतिनिधी / बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविल्यास राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात येईल. लॉकडाऊनसंबंधी आपण पंतप्रधानांच्या निर्देशाची प्रतीक्षा करत आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यात जारी असणारा कोरोना कर्फ्यू 12 मे पर्यंत सुरूच राहणार आहे.
नवी दिल्ली येथे बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊनसंबंधी कोणताही निर्णय झाला नाही. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यासाठी पंतप्रधानांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडून मिळणाऱया सूचनेनुसार राज्यातही निर्णय घेतला जाईल, असे येडियुराप्पा म्हणाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत के. सी. रेड्डी यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त विधानसौध येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ते बोलत होते.
ते म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी कठोर निर्णय घेणे अनिवार्य आहे. संपूर्ण लॉकडाऊनसंबंधी पंतप्रधान कोणता निर्णय घेतात, यावर राज्य सरकारचा निर्णय अवलंबून असणार आहे. राज्यात 12 मे पर्यंत कोरोना कर्फ्यू जारी आहे. कर्फ्यूचा कालावधी वाढविण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.