ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आले असता त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात. पण आम्ही कधी त्यांच्याकडे राजीव गांधी यांचे पुत्र असल्याचा पुरावा मागितलाय का? असे वादग्रस्त वक्तव्य बिस्वा शर्मा यांनी केले आहे. आता या वक्तव्यांनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावरून देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हेमंत “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?” असा प्रश्न आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी विचारला होता. या विधानावर काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून आता त्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीका केली आहे. “हे भाजपाचे संस्कार आहेत का?” असा सवाल करतानाच चंद्रशेखर राव यांनी हेमंत बिस्व शर्मा यांना बडतर्फ करण्याची देखील मागणी केली आहे.
चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमधील रायगिरीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं. “पंतप्रधान मोदीजी, हे भाजपचे संस्कार आहेत का? हा आपला हिंदू धर्म आहे का? ही आपल्या देशाची संस्कृती आहे का? एका नेत्याला तुमचे मुख्यमंत्री तुमचे वडील कोण आहेत? असा प्रश्न विचारत आहेत. माझी मान शरमेनं झुकली आहे. माझ्या डोळ्यांत पाणी येत आहे. या देशासाठी ही बाब चांगली नाही”, असं राव म्हणाले आहेत.