ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
गुवाहाटी येथे माध्यमांशी संवाद साधताना शर्मा म्हणाले, आमचे लष्करी जवान शत्रूच्या प्रदेशात कोणत्याही कारवाईसाठी जाण्यापूर्वी एक महिन्यासाठी योजना आखतात, या धोरणात्मक कारवाया असतात आणि कारवाई झाल्यानंतर प्रेस रिलीझ जारी केले जाते, त्यानंतर आम्हाला कळते. जर कोणी अशा धाडसी कारवाईचा पुरावा मागत असेल तर लष्कराच्या जवानाला किती वेदना होतात याचा विचार करा. हा केवळ जवानांचा अपमान आहे. राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात, त्यावरुन असे वाटते की त्यांच्यामध्ये जिनांचे भूत शिरले आहे. हे त्यांना फक्त गुजरातपासून पश्चिमबंगालपर्यंतच भारतात दिसते. त्यामुळे ते 1947 पूर्वीची जिनांची भाषा वापरत आहेत.
सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना आम्ही कधी ते राजीव गांधी यांचे पुत्र असल्याचा पुरावा मागितलाय का?, असे वादग्रस्त विधान दोन दिवसांपूर्वीच शर्मा यांनी केले होते. त्यावरून वादंग उठले असतानाच त्यांनी राहुल गांधींमध्ये जिनांचे भूत शिरल्याची टीका केली. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.