दापोली / प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळ होऊन आता पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सुमारे ६० टक्के गावांचा वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. पंधरा दिवसांपासून गावातील व घरातील सर्व उपकरणे विजे अभावी बंद असल्याने व घरबांधणीची कामे खोळंबली असल्याने लोकांचा आता उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. दापोली तालुक्यातील अडखळ येथील ग्रामस्थांनी नुकतीच दापोली शहरातील काळकाई कोंड येथील वीज कार्यालयावर धडक दिली व गावात लाईट गावात वीज पुरवठा कधी सुरू होणार याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दापोली तालुक्यात अद्याप 60 टक्के गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे चक्रीवादळात ज्या घरांचे नुकसान झालेली आहे त्या घरांची कामे खोळंबली आहेत. विजेअभावी वेल्डिंग, ड्रीलिंग, कटिंगची घरांची कामे होऊ शकत नाहीत. चक्रीवादळात काही घरांचे पत्रे जरी उडून गेले असले तरी वीज नसल्याने घरावर टाकायला घरावर पत्रे टाकता येत नसल्याने अनेकांची घरे ओली होऊन खिळखिळी होत आहेत. यातील काही घरे घरांच्या। भिंती आता पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. वीज पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास या धोकादायक घरांमध्ये कसे राहायचे असा प्रश्न ग्रामस्थांच्या समोर आ वासून पडला आहे.