शिरोभाग ः येत्या 18 जुलैला देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपती हे पद केवळ औपचारिक असले तरी ते महत्वाचे मानले जाते. त्यामुळे राष्ट्रपती कोण होणार हा ज्याच्या त्याच्या उत्सुकतेचा विषय असतो. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. त्याआधी नव्या राष्ट्रपतींची नियुक्ती होणे आवश्यक आहे. कारण हे पद रिक्त ठेवता येत नाही. यंदाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतगणना 21 जुलैला होणार असून त्याच दिवशी परिणाम घोषित केला जाणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक नेहमीच्या लोकसभा किंवा विधानसभांच्या निवडणुकीसारखी थेट जनतेतून होत नाही. तर या निवडणुकीत मतदात्यांची भूमिका लोकसभा व राज्यसभेतील खासदार आणि सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे आमदार यांना निभवावी लागते. विधान परिषदेच्या आमदारांना मात्र मतदानाचा अधिकार नसतो. या निवडणुकीचे स्वरुप कसे असते आणि ते तसे का असते यासंबंधी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. ही निवडणूक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन होणे आवश्यक असते. मतदारांच्या मतांचे मूल्य म्हणजे काय हा ही प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा संक्षिप्त प्रयत्न या सदरात करण्यात आला आहे…
राष्ट्रपतींचे महत्व आणि भूमिका…
ड राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च संसदीय, प्रशासकीय आणि सेनाप्रमुख असतात. त्यांच्यावर कोणतेही पद नसते. मात्र, ते नामधारी असतात. याचा अर्थ असा की सर्व अधिकार त्यांच्याकडे असूनही ते स्वतःच्या इच्छेनुसार त्यांचा उपयोग करु शकत नाहीत. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवरच अवलंबून रहावे लागते.
ड संसदेने संमत केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतींची संमती स्वाक्षरी मिळाल्याखेरीज त्याचे कायद्यात रुपांतर होत नाही. मात्र, राष्ट्रपती संसदेने विधिवत संमत केलेल्या कोणत्याही विधेयकावर अनुमतीदर्शक स्वाक्षरी करणे नाकारु शकत नाहीत. केंद्राचे अध्यादेशही राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनेच काढावे लागत असतात.
ड राष्ट्रपतींनी एखाद्या विधेयकावर किंवा अध्यादेशावर स्वाक्षरी करण्याचे नाकारले तर ते विधेयक किंवा अध्यादेश पुन्हा परत पाठविला जातो. ते विधेयक संसदेने किंवा तो अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाने पुन्हा संमत केल्यास त्यावर राष्ट्रपतींना स्वाक्षरी करावीच लागते. अन्यथा स्वाक्षरीविनाच तो लागू होतो.
ड लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोणालाही बहुमत न मिळाल्यास, जो पक्ष किंवा युती स्थिर सरकार देऊ शकेल अशा पक्षाला किंवा युतीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. हा एकच प्रसंग असा असतो, की राष्ट्रपती स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार यासंबंधीचा निर्णय घेऊ शकतात.
ड एखाद्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात राजकीय किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करायची झाल्यास राष्ट्रपतींची अनुमती आवश्यक असते. मात्र, ही अनुमतीही ते स्वेच्छेने नव्हे तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसारच देऊ शकतात. अन्यथा ते शक्य नसते.
ड प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असतो. हे अभिभाषण अत्यंत महत्वाचे असते. तथापि, हे भाषणही राष्ट्रपती स्वतःच्या मनाने तयार करु शकत नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाने तयार पेलेले भाषणच त्यांना वाचून दाखवावे लागते. त्यात बदल करता येत नाही.
ड राष्ट्रपती हे भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही सरंक्षण दलांचे औपचारिक अधिपती असतात. त्यांच्या आदेशाशिवाय सैन्य महत्वाचे निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, राष्ट्रपतींना हा आदेश स्वबळावर देता येत नाही, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने तो तयार करावा लागतो आणि राष्ट्रपती घोषणा करतात.
ड देशातील सर्व सार्वजनिक कंपन्यांच्या मालमत्तेचे स्वामी राष्ट्रपती असतात. त्यादृष्टीने भारताचे राष्ट्रपती हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, असे म्हणावे लागते. मात्र, राष्ट्रपतींचे वेतन वगळता या मालमत्तेपैकी एक पैशाचाही विनियोग त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया…
1. मतदार
या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार (नामनिर्दिष्ट खासदार वगळून) आणि सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधी आमदार हे मतदार असतात. मात्र, विधानपरिषद सदस्य मतदान नसतात.
2. मतांचे मूल्य
प्रत्येक मतदाराला एक मत देता येते. मात्र, मतांची गोळाबेरीज करताना मतांची संख्या नव्हे, तर मतांचे मूल्य लक्षात घेतले जाते. हे मूल्य ठरविण्याची विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत याच सदरात पुढच्या भागात देण्यात आली आहे.
3. मतदान पद्धती
राष्ट्रपती पदासाठीचे मतदान कागदी मतपत्रिकेवर केले जाते. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राचा उपयोग केला जात नाही. तसेच हे पर्यायी पद्धतीचे (प्रेफरन्शिअल) मतदान नसते. प्रत्येक मतदार एकच मत देऊ शकतो.
4 उमेदवाराची पात्रता
भारताचा वैध नागरिक असलेली आणि वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार असू शकते. शिक्षणाची किंवा अन्य कोणतीही अट नाही. मात्र, किमान 10 खासदारांचे अनुमोदन आवश्यक असते. उमेदवाराकडे कोणतेही केंद्रीय किंवा राज्यस्तरीय लाभाचे पद असता कामा नये.
मताचे मूल्य कसे ठरविले जाते…
1. आमदाराच्या मताचे मूल्य
प्रत्येक राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा आमदाराच्या मताचे मूल्य भिन्न भिन्न असते. ते त्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या आणि त्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या यांचे गुणोत्तर असते.
आमदाराच्या मतमूल्याचे सूत्र
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची एकंदर लोकसंख्या गुणिले 1000
विधानसभेची एकंदर सदस्यसंख्या
2. खासदाराच्या मताचे मूल्य
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा आमदारांच्या मतमूल्याची बेरीज
लोकसभा आणि राज्यसभेच्या एकंदर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या
निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांची जास्तीत जास्त संख्या 543 आहे. तर राज्यसभा सदस्यांची संख्या 233 आहे. अशाप्रकारे एकंदर खासदारांची संख्या 776 इतकी असून वरील सूत्राप्रमाणे त्यांचे मतमूल्य प्रत्येकी 708 आहे. तर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्यांची संख्या 4,120 आहे. अशाप्रकारे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची एकंदर मतदारसंख्या 4,896 आहे.
एकंदर मतमूल्य
1. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचे एकंदर मतमूल्य 5,49,408
2. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आमदारांच्या एकंदर मतांचे मूल्य 5,49,493.
3. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या एकंदर मतांचे मूल्य 10,98,903
4. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतमूल्य किमान 5,49,452
कोण जिंकू शकेल
ड राष्ट्रपती पदाची निवडणूक निर्विरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, विरोधी पक्षांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने मतदान घ्यावे लागणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दोन्ही बाजू तयारीला लागल्या आहेत.
ड सध्या भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्याकडे 5,26,000 हून अधिक, अर्थात, जवळपास 49 टक्के मते आहेत. त्याला बहुमतासाठी जवळपास 23 हजार मतमूल्याची आवश्यकता आहे. तर विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडीकडे जवळपास 4,10,000 मते आहेत. या दोन आघाडय़ा वगळता इतर पक्ष व अपक्षांकडे 1,62,000 मते आहेत. अन्य पक्षांपैकी बिजू जनता दल किंवा वायएसआर काँगेस यांनी रालोआला पाठिंबा दिल्यास त्यांचा उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो. साहजिकच सध्या भाजप-रालोआचे पारडे जड आहे.
राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे प्रत्येकी मतमूल्य
राज्य, केंदशासित प्रदेश विधानसभा सदस्यसंख्या मतमूल्य
आंध्र प्रदेश 175 159
अरुणाचल प्रदेश 60 008
आसाम 126 116
बिहार 243 173
छत्तीसगड 90 129
दिल्ली 70 058
गोवा 40 020
गुजरात 182 147
हरियाणा 90 112
हिमाचल प्रदेश 68 051
जम्मू काश्मीर 87 072
झारखंड 81 176
कर्नाटक 224 131
केरळ 140 152
मध्यप्रदेश 230 131
महाराष्ट्र 288 175
मणिपूर 60 018
मेघालय 60 017
मिझोराम 40 008
नागालँड 60 009
ओडिशा 147 149
पुदुच्चेरी 30 016
पंजाब 117 116
राजस्थान 200 129
सिक्कीम 32 007
तामिळनाडू 237 176
तेलंगणा 119 132
त्रिपुरा 60 26
उत्तर प्रदेश 403 208
उत्तराखंड 70 64
पश्चिम बंगाल 294 151
एकंदर 4,120
– संकलन – अजित दात्ये
राष्ट्रपती निवडणूक-2022 दृष्टिक्षेप…
15 जून निवडणुकीची अधिसूचना जारी
29 जून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
30 जून उमेदवारी अर्जांची छाननी होणार
2 जुलै अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
18 जुलै निवडणुकीसाठी मतदान
21 जुलै निकाल / मतमोजणी
मतदारसंख्या…
776 खासदार
4033 आमदार
4809 एकूण मतदार
2017 मधील निवडणूक
2017 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलै रोजी घेण्यात आली आणि 20 जुलै रोजी मतमोजणी झाली. गेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएची कामगिरी अव्वल ठरली होती. रामनाथ कोविंद यांना 65.35 टक्के मते मिळाली. यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याचा एनडीएचा प्रयत्न आहे. रामनाथ कोविंद यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि विरोधी उमेदवार मीरा कुमार यांचा जवळपास 3 लाख 34 हजार 730 मतांनी पराभव केला होता.