उत्पल यांचे बाबूश यांच्यावर जोरदार टीकास्त्र
प्रतिनिधी/ पणजी
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहता त्यांच्या नेतृत्वात दम नसल्याचेच दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सर्व पातळ्यांवर ते सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी जोरदार टीका निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी केली आहे. मोन्सेरात यांचे हे अपयश पाहता आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून पणजीची गेलेली रया पुनःस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन उत्पल पर्रीकर यांनी केले.
शनिवारी ते पणजीत पत्रकारांशी बोलत होते. मोन्सेरात यांना जनादेश मिळून ते विजयी झाले. त्या लोकमताचा आदर राखत आपण आजपर्यंत मोन्सेरात यांच्या विरोधात काहीच बोललो नव्हतो. कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उठसूठ वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांकडे जाणे आणि विनाअभ्यास बडबड करणे आपल्या स्वभावात बसत नाही. परंतु आता पाणी नाकापर्यंत पोहोचले आहे. पणजी शहराची अक्षरशः दैनावस्था होत असताना आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आज बोलावेच लागले, असे उत्पल यांनी उद्वीग्न मनस्थितीत सांगितले.
पहिल्याच पावसात पणजी शहर पूर्णतः पाण्याखाली गेले. शहर पाण्याखाली जाते ही वेगळी बाब असली तरी शहरात पाणी तुंबू नये तसेच खराब रस्त्यांसाठी आमदार मोन्सेरात यांनी कोणते नियोजन केले? हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्यादृष्टीने कोणते प्रयत्न केले? असे सवाल उपस्थित होतात तेव्हा त्यांची उत्तरे मिळत नाहीत, असे उत्पल म्हणाले.
मात्र यासाठी आपण बाबूश यांना दोष देत नाही. कारण त्यांना पणजीकरांच्या नेतृत्वापेक्षा पणजीतील रिअल इस्टेटचे नेतृत्व करण्यात जास्त रस आहे, हेच त्यातून स्पष्ट होत आहे आणि ही गोष्ट येथील प्रत्येक नागरिकास माहीत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
पणजी ही राज्याची राजधानी आहे. या शहराची सध्या झालेली वाताहत पाहता मुख्यमंत्र्यांनी स्थानिक आमदारावर विसंबून न राहता स्वतः लक्ष घालण्याची वेळ आली आहे. पुढील पावसात पूर येणार नाही यासाठी कोणती यंत्रणा राबवावी, उपाययोजना आखाव्यात याचे नियोजन स्वतः मुख्यमंत्र्यांनी करावे. अन्यथा आमदार आणि महापौर ही ‘फादर-सन इंटरप्रायजेस’ पुढील पाच वर्षात पणजीला ‘राजधानी’ म्हणण्याच्या लायकीची ठेवणार नाहीत, असे मत उत्पल यांनी व्यक्त केले.
काही वर्षापूर्वी पणजीत ठराविक ठिकाणीच पावसाळ्यात पाणी तुंबत होतो. आता जवळजवळ सर्वच भाग पाण्याखाली जात आहेत. यावर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती ओढवली नसती. परंतु नेतृत्वाचाच अभाव आणि लोकहितापेक्षा स्वहित साध्य करण्यातच जास्त स्वारस्य यामुळे पणजी अस्तित्वशून्य बनत आहे, असे उत्पल म्हणाले.
पणजीतील रस्त्यांच्या अवस्थेबद्दल बोलताना त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पणजीत केवळ निवडणूक काळातच डांबराचा वास येतो, असे वक्तव्य यापूर्वीही आपण केले होते आणि वेळोवेळी ते सत्य ठरत आहे. येथील रस्त्यांची झालेली अधोगती पाहता विद्यार्थ्याच्या वहीचे आवरणसुद्धा वर्षभर टिकते. पण पणजीतील रस्त्यांना दिलेला हॉटमिक्सरुपी डांबराचा लेप धड सहा महिनेसुद्धा टिकत नाही, हे पणजीकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशा शब्दात उत्पल यांनी बाबूश यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले.
ही स्थिती अशीच राहिल्यास पुढील पाच वर्षांत पणजीला राजधानी म्हणण्याससुद्धा आम्हाला लाज वाटेल किंवा विधानसभा संकुलाच्या सभोवतालचा परिसर तेवढाच राजधानी म्हणून जाहीर करावा लागेल, असे मार्मिक भाष्यही उत्पल पर्रीकर यांनी यावेळी केले.