बालगोपाळांसह पालकांनीही लुटला आनंद : सजग पालक सामाजिक संस्थेचा उपक्रम
प्रतिनिधी/ सातारा
निसर्गात टेकडीवर, मोकळय़ा जागेत तासन्तास पतंग उडवणे हा बालपणीचा सर्वांचा आवडता छंद. स्वतः तयार केलेली पतंग जेव्हा अवकाशात घिरटय़ा घालते, तो आनंद जीवनात प्रत्येकाने अनुभवलेला. मात्र, शहरीकरणामुळे व काळाच्या ओघात पतंग उडवणेच विसरु लागलेल्या मुलांना साताऱयातील सजग पालक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पतंग महोत्सवाचे आयोजन करुन बालगोपाळांसह पालकांना देखील अवकाशात विहार करायला लावला. निसर्गरम्य हिरव्यागार यवतेश्वरच्या पठारावर साडेतीनशे ते चारशे बालगोपाळांसह पालकांनी पतंग महोत्सवात सहभागी होवून आनंद लुटला.
पालक व पाल्यातील नाते सदृढ, आनंदी व खेळकर रहावे यासाठी कार्यरत असलेल्या सजग पालक सामाजिक संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये अगदी संवादापासून ते एकत्रित येवून पाल्यांबरोबर आनंदी सहजीवन कसे व्यतीत करावे यासाठी प्रयत्न केले जातात. पाल्य अभ्यासात चांगला असला पाहिजे; पण त्याबरोबर त्यांच्या बालपणातील आनंदाचे क्षण देखील त्याने अनुभवून जीवनाचा खरा आनंद घेतला पाहिजे, ही भूमिका घेवून सजग पालक सामाजिक संस्था काम करत असते.
दोन दिवसांपूर्वी सजग पालक संस्थेने असाच एक उपक्रम राबवला तो पतंग महोत्सवाचा. सुट्टीच्या दिवशी 100 ते 150 मुलामुलींसह त्यांच्या पालकांना सोबत घेवून निसर्गरम्य यवतेश्वर पठारावर हा पतंग महोत्सव सहभागी झालेल्या मुलांसह पालकांना देखील वेगळा आनंद देवून गेला. यामध्ये साध्या-साध्या पतंगासह विविध आकारातील व स्वरुपातील डिझाईनचे पतंग घेवून बालगोपाळ सहभागी झाले होते. मग कोणाचा गरुडासारखा दिसणारा पतंग पंख झेपावत आकाशात डौलदारपणे घिरटय़ा घालत होता, तर कोणाचे विमान उंच-उंच जात होते. अनेकविध रंगाचे पतंग आणि दोऱयांचा महामेळा जमला होता.
कासकडून अवखळत वाहणारा वारा, जोडीला हिरवागार निसर्ग, मोकळे प्रशस्त पठार आणि त्यावर दंगामस्ती, मौजमजा करत झालेला पतंग महोत्सव. आकाशात उंच उंच उडणारे रंगबेरंगी पतंग पाहताना बालगोपाळांसह पालकदेखील दंग होवून गेले होते. पालक आपल्या मुलांना पंतग उडवण्यासाठी सहाय्य करताना त्यांच्या बालपणीच्या आनंदी क्षणात हरवून गेले होते. अरे किती तरी दिवसांनी आपण पतंग हातात धरला ही भावना देखील सगळय़ा वातावरणाला आनंदीत करुन गेली होती. पतंग महोत्सवासाठी पठाराच्या खाली रस्त्यावर लागलेल्या गाडय़ा, दुचाकींच्या रांगा पाहून येणारे जाणारे पर्यटक देखील अरे इथे काय आहे? म्हणून अचंबित होवून थांबत होते आणि आकाशात विहारणारे असंख्य पतंग पाहून उल्हासित झाल्याचे चित्र यानिमित्ताने सर्वांनाचा अनुभवास मिळाले.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द उद्योजक प्रवीण शेळके यांच्या हस्ते व ‘तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थित झाले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह योगेश नाईक, विपुल मोरे, विनोद सूर्यवंशी, विजय कांबळे, डॉ. प्रसन्न साळुंखे, भद्रेश शहा, संतोष माने, प्रवीण भोसले, सिद्धराज शेटे, मोनिका शिंदे यांनी परिश्रम घेतले.::
पतंग महोत्सवाने सर्वांना आनंद दिला
आपले बालपणीतील पारंपरिक खेळ नव्या पिढीला माहिती व्हावेत, त्यांच्यातील बाल्य फक्त अभ्यासात न हरवता जीवनातील खेळण्या-बागडण्याचा आनंद त्यांना मिळावा. त्यातूनच मग पाल्य व पालक यांच्यातील नाते आणखी बहरते ही भावना रुजवण्यासाठी आमची संस्था विविध उपक्रम राबवते. पतंग महोत्सवाची कल्पना देखील अशीच समोर आली आणि मग त्यात सर्वांनी सहभाग घेवून ती यशस्वी केली. यावेळी बाळगोपाळांसह पालकांना मिळालेला आनंद अवर्णनीय होता.::