प्रतिनिधी/ लांजा
दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूक पार्श्वभूमीवर जिह्यातील शिक्षक संघटननेतील फोडाफोडीच्या राजकारणने वेग घेतला आहे. या घडामोडींचा लांजा हा केंद्रबिंदू बनला असून दोन शिक्षक संघ, पुरोगामी आणि शिक्षक समिती यात आतापासूनच शीतयुद्ध रंगू लागले आहे.
संभाजी पाटील गटाने शिवाजी पाटलांच्या गटांतील वजनदार पदाधिकारी आपल्या गोटात वळविण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पतपेढीच्या चेअरमन पदावरुन सुरू झालेली ही लढाई आता तीव्र झाली आहे. दरम्यान शिक्षक समितीतील काही नाराज कार्यकर्ते पुरोगामी समितीकडे आकृष्ट झाले आहेत. नुकतीच लांजात ‘पुरोगामी’ची चिंतन बैठक पार पडली होती. जिल्हा संघात दोन गट परस्पर विरोधी कार्यरत आहेत.
मध्यतरी चिपळूणचे संतोष कदम यांच्यावर शिवाजी गटाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. चार संघटना मिळून जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीत युती आहे. चेअरमन पद ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्यात आले आहे. यावेळी संघाकडे चेअरमन पद आहे. या निवडी दरम्यान मंडणगड आणि गुहागर आणि रत्नागिरी येथिल तीन संघ संचालक इच्छुक होते. मंडणगडला चेअरमन देण्यासाठी उत्तर भाग राजी होता. परुंतु दिलिप देवळेकर यांचे पारडे ऐनवेळी जड झाले होते. चिपळूण ओमळी येथील संतोष कदम यांना जिल्हाध्यक्ष जबाबदारी देऊन अंतर्गत मतभेद दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र रत्नागिरीतील काही जण नाराज होते. त्यातील एकजण चार दिवसांपूर्वी संभाजी पाटील गटाकडे प्रवेशकर्ते झाले. दरम्यान संघटनेचा स्वार्थासाठी उपयोग केला असे दुसरीकडे गेल्याने काही फरक पडणार नसल्याचा दावा शिवाजी पाटील गटाने केला आहे.
लांजात मागील शिक्षक पतपेढी निवडणूकीपासून शह काटशह सुरू आहे. संतोष पावणे यांचा पराभव झाल्यानंतरही जिल्हा कार्यकारणीवर वर्णी लागल्याबद्दल समितीच्या काही सदस्यांचा आक्षेप आहे. लांजात समितीने शिक्षकांचे विविध प्रश्न हाताळून पुन्हा उभारणी केली आहे. वाढता प्रभाव लक्षात घेऊन पुरोगामी समिती सक्रिय झाली आहे. त्यातील नाराजांना आपल्या गोटात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत . रविवारी पुरोगामीच्या गुप्त बैठकीत अन्य संघटनाच्या काही पदाधिकारीऱयांनी हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.