बिहारमधील धक्कादायक घटना : केवळ मनात आल्याने कृत्य
वृत्तसंस्था/ सीवान
बिहारमध्ये सीवान जिल्हय़ाच्या अलीमर्दनपूर गावात एका विक्षिप्त व्यक्तीने स्वतःच्या 5 अपत्यांवर आणि पत्नीवर कुऱहाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात 4 मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी आणि एक मुलगी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. आरोपीने गुन्हय़ानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
आरोपी अवधेश चौधरीने स्वतःच पोलिसांना फोन करून गुन्हय़ाची माहिती दिली होती. आरोपीकडे हल्ल्यामागील कारण विचारले असता केवळ मनात आले म्हणून कुऱहाडीने वार केल्याचे त्याने सांगितले आहे. अवधेशने मुलांच्या हत्येनंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या मोबाईलवर कॉल केला होता, परंतु त्यांनी तो रिसीव्ह केला नव्हता. याचमुळे त्याने पोलीस स्थानकात फोन करून घडलेला प्रकार सांगितला होता.