प्रतिनिधी / बेळगाव
पत्रकाराने निर्भयपणे पत्रकारिता केली पाहिजे. कष्ट घेण्याची तयारी, प्रामाणिकपणा, प्रलोभनाला बळी न पडण्याचा निर्धार आणि आत्मविश्वास या गुणांच्या जोरावरच पत्रकार यशस्वी होतो, असे विचार ज्ये÷ पत्रकार सर्जु काटकर यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकार विकास अकादमीतर्फे नेहरूनगर येथील अकादमीच्या कार्यालयात बुधवारी सकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कट्टीमनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्जु काटकर यांचा तसेच कोरोनाकाळात अनेकांना मदत करणारे व कोरोना योद्धा ठरलेले पब्लिक टीव्हीचे पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्जु काटकर बोलत होते. व्यासपीठावर तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री होते.
सर्जु काटकर म्हणाले, आम्हाला पत्रकारितेमध्ये थोर गुरू लाभले. आपल्या शहराचा इतिहास लिहिण्यापासून त्यांनी आमच्याकडून सराव करून घेतला. कोणत्याही पत्रकार परिषदेला आणि कार्यक्रमांना अभ्यास केल्याशिवाय जाऊ नका हा त्यांचा सल्ला आम्ही कायम आचरणात आणला. पत्रकाराने निर्भय असले पाहिजे तरच त्याची लेखणी सडेतोड लिखाण करू शकते. अक्षरे ही पत्रकाराचे दैवत आहे. त्याच्याशी पत्रकारांनी नेहमीच नि÷sने राहायला हवे. हा पेशा खूप सन्मानाचा आणि पवित्र पेशा आहे, याची जाणीव प्रत्येक पत्रकाराने ठेवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
प्रारंभी दिवंगत ज्ये÷ पत्रकार अशोक याळगी व राघवेंद्र जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सत्कारमूर्ती व जयवंत मंत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बाळ शास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष प्रसाद सु. प्रभू यांनी स्वागत करून सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.
अकादमीचे सदस्य नेताजी जाधव म्हणाले, पत्रकार अकादमीने नेहमीच उत्तम कार्य केले आहे. पत्रकारांच्या सुख-दु:खात अकादमी सहभागी होत आली आहे. कोरोना काळात पत्रकारांच्या अडचणींमध्ये अकादमीने अनेकांना मदत केली आहे. आणि यापुढेही करत राहीन.
जयवंत मंत्री यांच्या हस्ते सर्जु काटकर व दिलीप कुरुंदवाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयवंत मंत्री म्हणाले, पत्रकाराची भाषा उत्तम असली पाहिजे. त्याच्याकडे शब्द भांडार असायला हवे. पत्रकार सृजनशील असावा. त्यामुळे केवळ वृत्तांकनच नव्हे तर उत्तम साहित्यही तो निर्माण करू शकतो.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्जु काटकर म्हणाले, समाजाचे प्रतिबिंब पत्रकारितेमध्ये उमटायला हवे, अशी अपेक्षा असल्याने पत्रकारिता म्हणजे आरसा असे समजले जाते. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणि आवश्यक त्या वेळी क्रांती घडविण्याचे सामर्थ्य पत्रकारितेमध्ये आहे. या महत्त्वाच्या आणि समाजाशी नाळ जोडणाऱया पेशाबरोबर पत्रकारांनी कधीही द्रोह करून चालणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या पत्रकारितेतील अनेक घटनांना उजाळा दिला.
याप्रसंगी अकादमीचे ज्ये÷ सदस्य प्रशांत बर्डे यांच्यासह सर्व सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसाद सु. प्रभू यांनी केले.
पत्रकाराने उत्तम कामगिरी केल्यास समाजात त्याला कसा मान मिळतो याचे उदाहरण देताना सर्जु काटकर म्हणाले, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते बेळगावला आले होते. त्यांच्या एका कार्यक्रमावेळी तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर आले असताना खुद्द मोरारजी देसाई उठून उभे राहिले. हा मान बाबुराव ठाकुर यांच्या कार्याला आणि नि:स्पृह पत्रकारितेला होता.