प्रतिनिधी / कणकवली:
‘तरुण भारत’चे सिंधुदुर्गचे आवृत्तीप्रमुख व निर्भिड पत्रकार शेखर सामंत यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्त बुधवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईत राजभवन येथे सन्मान सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक संपादन आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. सामंत यांनी ‘तरुण भारत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये काम करीत असताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात येणार आहे. सामंत हे त्यांच्या 28 वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेच्या बाजूने निर्भिडपणे लिखाण करीत आहेत.
सामंत हे ‘तरुण भारत’चे सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्तीप्रमुख म्हणून यशस्वीरित्या कार्यरत आहेत. बी. कॉम. पर्यंत शिक्षण झालेल्या सामंत यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम तसेच मास्टर ऑफ सोशल वर्क या पदव्याही मिळविल्या आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय शोधक पत्रकारिता पुरस्कार (मुख्यमंत्र्यांच्या हस्ते), कुडाळ देशकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, मुंबई, महाराष्ट्र कर्नाटक उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, बेळगाव, बाळशास्त्राr जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्ग, विभागस्तरीय धाडसी पत्रकार पुरस्कार, कोल्हापूर, जिल्हास्तरीय सामाजिक पत्रकार पुरस्कार, सिंधुदुर्ग, जिल्हास्तरीय क्रीडा पत्रकार पुरस्कार, सिंधुदुर्ग, अटल प्रतिष्ठान आदर्श पत्रकार पुरस्कार, सावंतवाडी, वेंगुर्ले नगरपालिका वेंगुर्लेरत्न पुरस्कार हे पुरस्कार मिळाले आहेत.
शेखर सामंत यांनी पत्रकार म्हणून सिंधुदुर्गसह मुंबई, गोवा, कर्नाटक, काश्मीर, मध्यप्रदेश, दिल्ली व राजस्थान येथेही काम केले आहे. भारत-पाक, भारत-चीन सीमेवर तसेच जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या सियाचीन या युद्धभूमीत यशस्वी वृत्तांकन केले आहे. दिल्ली येथे भरलेल्या जागतिक शूटिंग स्पर्धेचे वृत्तांकनही त्यांनी केले आहे. सामंत यांनी लिखाण करताना अनेक भोंदूबाबा, महाराजांच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्ततेसाठी काम केले आहे. समाजातील पीडित, रंजल्या गांजल्यांच्या पाठिशी ते खंबीर उभे राहिले आहेत. तसेच जिल्हय़ातील एड्स व एचआयव्हीग्रस्त बांधवांना मदत केली आहे. जिल्हय़ातील विविध सामाजिक संघटनांना सहकार्य, युवकांसाठी प्रबोधन कार्यक्रम, अनेक खून प्रकरणांना वाचा फोडणे, भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले आहे. आकाशवाणीवरही त्यांनी विचार मांडले आहेत. क्रीडा क्षेत्रात एक खेळाडू व प्रशिक्षक म्हणून जिल्हा, राज्य, विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीपर्यंत विशेष कामगिरी केली आहे. ऍथलॅटिक्स, कबड्डी व कराटे खेळामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. तसेच प्रशिक्षक म्हणून त्यांनी जिल्हय़ात अनेक खेळाडू घडविले आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात येणाऱया या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.