प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर आणि उपनगरात डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत विविध मुख्य मार्गावर पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र श्री बसवेश्वर उड्डाणपुलावरील मोडकळीस आलेला पथदीप बदलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून मोडलेला खांब उड्डाणपुलावरच पडून आहे.
संपूर्ण शहर स्मार्ट बनविण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दुभाजक घालण्यात आले आहेत. तसेच प्रमुख मार्गांसह वर्दळीच्या रस्त्याशेजारी डेकोरेटिव्ह दिवे बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच नवीन पथदीप देखील बसविण्यात येत असून, याकरिता कोटीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर शहरातील निम्म्याहून अधिक पथदीप बसविण्यात आले. विशेषतः किल्ला अशोक चौक ते गोगटे चौकपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पथदीप हटवून नवीन पथदीप बसविण्यात आले. मात्र गोगटे चौक ते मराठा मंदिरपर्यंतच्या बसवेश्वर उड्डाणपुलावरील मोडकळीस आलेले पथदीप बदलण्यात आलेले नाहीत. तसेच यापैकी काही पथदीप बंद असून, दुरुस्ती करण्याकडे देखील कानाडोळा केला आहे. उड्डाणपुलावरील पथदीप वाहनाच्या ठोकरीमुळे मोडकळीस आला होता. सदर खांब बदलणे आवश्यक होते. पण जेसीबीच्या साहाय्याने हा खांब उड्डाणपुलावरील दुभाजकावरच ठेवण्यात आला आहे. तो हटविण्यातही आला नाही. आणि बदलण्याची कार्यवाही देखील करण्यात आली नाही. शहर आणि उपनगरातील शेकडो पथदीप बदलण्यात आले. मात्र मोडकळीस आलेला हा खांब बदलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मोडकळीस आलेला खांब कधी बदलणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.