शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय : उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनामुळे लांबणीवर पडलेले शैक्षणिक वर्ष अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. आता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरलेला नसला तरी पदवी महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासूनच सुरू करण्यात येणार आहे. ऑनलाईनद्वारे पूर्ण प्रमाणात शिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात येणार असले तरी ऑक्टोबरपासून नियमित वर्ग सुरू केले जाणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.
बेंगळूरमधील सुब्रह्मण्यनगर प्रभागात मंगळवारी विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारकडून पदवी महाविद्यालयांचे नियमित वर्ग भरविण्यासंबंधी मार्गसूची अद्याप आलेली नाही. सप्टेंबर महिन्यात पदवीच्या काही परीक्षा होणार आहेत. त्यामुळे सरकारने सप्टेंबरपासून ऑनलाईनद्वारेच सर्व शैक्षणिक उपक्रम पूर्ण प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ऑक्टोबरपासून सर्व महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना देखील नियमित वर्गांना हजर राहता येणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील पदवी महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरू करण्याबाबत युजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) मार्गसूचीनुसार सर्व प्रकारची पूर्वतयारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आदेश येताच कार्यवाही सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. प्राथमिक-माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालये केव्हा सुरू होतील याबाबत डॉ. अश्वथ नारायण यांनी कोणतीही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होण्याबाबत साशंकता आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबरोबरच पदवीच्या अंतिम वर्षातील सर्व पदवी, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय बॅकलॉग विषयांच्या परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भविष्याला धक्का पोहोचू नये या कारणासाठी परीक्षा रद्द न करता सुरक्षितपणे घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘नीट’ला विरोध नको!
सरकारने राज्यात 1 लाख 94 हजारहून अधिक विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे सीईटी घेतली आहे. त्यातही 63 विद्यार्थी कोरोनाबाधित असून देखील त्यांनी आत्मविश्वासाने सीईटी दिली आहे. वास्तविक स्थिती अशी असून देखील काही जण केंद्र सरकारकडून घेण्यात येणारी नीट परीक्षा घेण्यास का विरोध करीत आहेत, हे ठाऊक नाही. कोणीही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. मेरीटद्वारे जागा वाटप होऊ नये यासाठी हे कारस्थान करण्यात येत आहे. काही स्वार्थी हितशत्रू सुरुवातीपासूनच यंदा नीट परीक्षेला विरोध करीत आहेत. त्यांच्यामागे मोठे जाळेच असावे, असा आरोप करून डॉ. अश्वथ नारायण यांनी एका परीक्षेद्वारे देशातील विविध ठिकाणी प्रवेश देण्याची पद्धत उपयुक्त आहे. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱयांचा उद्देश सफल होणार नाही, अशा शब्दात त्यांनी नीटचे समर्थन केले.