कोरोना परिस्थितीमुळे सरकारचा निर्णय : अंतिम वर्ष, सेमिस्टरसाठी सप्टेंबरपर्यंत परीक्षा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य सरकारने 2019-20 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकीसह पदवी, पदव्यूत्तर पदवी, डिप्लोमा शिक्षण घेणाऱया अंतिम सेमिस्टर किंवा अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करून पुढील टप्प्यात-सेमिस्टरमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राज्यपाल तथा कुलपती वजुभाई वाला यांनी देखील हिरवा कंदील दाखविला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षातील अंतिम सेमिस्टर किंवा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) मार्गसूचीनुसार सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्यातील स्थितीचा विचार करून शिक्षण तज्ञ, विद्यापीठांच्या कुलगुरुंशी नियमित चर्चा करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, उपमुख्यमंत्री तसेच उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कोरोनामुळे यंदा शाळा-महाविद्यालये अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जारी झाल्याने परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. वर्ग देखील भरविणे शक्य झाले नाही. परीक्षेच्या दृष्टीने महविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी पदवीच्या अंतिम वर्ष-सेमिस्टर वगळता इतर विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना उत्तीर्ण करण्याबाबतची मार्गसूचीही तयार करण्यात आली आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे 50 टक्के आणि मागील सेमिस्टर/वर्षातील परीक्षा निकालातील 50 टक्के गुण एकत्र करून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तर प्रथम सेमिस्टर किंवा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनातील गुणांच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार आहे.
परीक्षेतील गुण वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱया विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरवेळी स्वतंत्रपणे परीक्षा देण्याची संधीही दिली जाणार आहे. बॅकलॉक विषयांच्या कॅरिओव्हरसाठी देखील संधी दिली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सीईटी 30-31 जुलै रोजी
व्यावसायिक शिक्षणासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा (सीईटी) यापूर्वी निश्चित केलेल्या तारखेनुसार म्हणजेच 30 व 31 जुलै रोजी होणार आहे. त्याकरिता आवश्यक पूर्वतयारी करण्याची सूचना परीक्षा विभाग आणि संबंधित अधिकाऱयांना देण्यात आली आहे. पदव्यूत्तर कोर्स प्रवेशासाठी 8 आणि 9 ऑगस्ट रोजी तसेच डिप्लोमासाठी 9 ऑगस्ट रोजी सीईटी होणार आहे. के-सेट परीक्षेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी दिली आहे.
1 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार
कोरोनामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये लवकर सुरू होण्याबाबत अनिश्चिता आहे. असे असतानाच राज्य सरकारने 1 ऑक्टोबरपासून पदवी महाविद्यालये सुरू होणार असून नेहमीप्रमाणे वर्ग भरतील, असे स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग भरविण्याची शिफारस शिक्षण तज्ञांनी केली आहे. मात्र याबाबत समर्थन-विरोध अशी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दुसरीकडे यंदा नियमितपणे वर्ग भरतील का, अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी, 1 ऑक्टोबरपासून पदवी महाविद्यालये नियमित सुरू होतील. पण् शाळा केव्हा सुरू करावीत, याबाबत सरकारी पातळीर निर्णय झालेला नाही, असे सांगितले आहे.