मच्छीमार, मासळीविक्रेते व खवय्यांकडून होणारी मागणी, कुटबण जेटीबाहेर लागतेय परप्रांतांतील ट्रकांची रांग
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
मासेमारी सुरू झालेली असली, तरी गोमंतकीयांना व्यवस्थित मासे मिळण्याच्या बाबतीत मात्र अजूनही मारामारच दिसत आहे. जे कुणी मासे मिळण्याच्या बाबतीत सुदैवी ठरत आहेत त्यांनाही ते खूप महाग दराने विकत घ्यावे लागत आहेत. गोमंतकीयांना सुलभपणे आणि वाजवी दरात मासे मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविताना गोव्यातील मासे परप्रांतांमध्ये नेण्याचे प्रकार बंद करावेत, अशी मागणी मच्छीमार, मासळीविक्रेते तसेच खवय्यांकडूनही होऊ लागली आहे.
दक्षिण गोव्यातील कुटबण जेटीवर गेल्यास जेटीबाहेर परप्रांतांतून आलेले मासळीवाहू ट्रक रांगेने थांबलेले दिसतात. यापूर्वी सदर ट्रकांचे काही चालक स्थानिकांमध्ये मिसळू लागल्याने तो चर्चेचा विषय बनून पोलीस तसेच तटरक्षक दलाला धाव घ्यावी लागली होती. तसेच त्या चालकांना विलगीकरणात ठेवावे लागले होते. कर्नाटकामध्ये कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण सापडण्याच्या प्रकारांमुळे तेथून येणारे मालवाहू ट्रक बंद करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. मासेवाहू वाहनांचे चालक विविध ठिकाणी फिरून येत असतात. त्याशिवाय गोव्यात केवळ कुटबण जेटीवरच नव्हे, तर अन्यत्रही या वाहनांचा वावर राहत असतो. त्यामुळे गोमंतकीयांना असलेला धोका लक्षात घेऊन हे मासेवाहू ट्रकही बंद करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
सध्या बाजारात बांगडे, ईसवण, कोळंबी अशी मासळी उपलब्ध असली, तरी ती लोकांपर्यंत खूप कमी प्रमाणात पोहोचत असल्याने महाग दरात मिळत आहे. 200 रुपयांत तीन वा 400 रुपये किलो याप्रमाणे बांगडय़ांची किरकोळ विक्री होत असून 800 ते 1000 रुपयांपर्यंत ईसवणचा प्रति किलो दर जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर परप्रांतांमध्ये पाठविली जाणारी मासळी बंद करण्याची मागणी आणखी वाढू लागली आहे. गोमंतकीयांना रास्त दरात व मुबलक मासे मिळण्याच्या दृष्टीने कुटबण येथील मच्छीमार संघटना व मत्स्योद्योग खाते यांची एक संयुक्त समिती स्थापन करावी व ट्रॉलर्सनी पकडलेल्या मासळीची त्याद्वारे विक्री करावी असा प्रस्ताव मच्छीमारांनी सरकारपुढे मांडला होता. मात्र त्यावर अद्याप विचार झालेला नाही. त्यामुळे मासळी एजंट थेट ट्रॉलर्समालकांकडे संपर्क साधून मिळेल तशी मासळी उचलत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री, मत्स्योद्योगमंत्र्यांनी लक्ष घालावे
यासंबंधी बोलताना काही मच्छीमारांनी वरील प्रकारची समिती स्थापण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे दरात समानता राहील व घाऊक विक्रेत्यांना जेटीवर येऊन त्यांच्याकडून मासळी घेऊन ती पालिका व पंचायत क्षेत्रात किरकोळ विक्री करणाऱया विक्रेत्यांना देणे सोयीस्कर ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. एका ट्रॉलरमालकाने आपण घरी मासळी नेऊन तेथून विक्रेत्यांना त्याची विक्री केल्याचे सांगितले. मात्र सर्वच ट्रॉलरमालकांना हे शक्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मासळी बाजार बंद ठेवलेले असल्याने माशांचे शक्य असेल, तर घरोघरी वितरण करा असे सरकारने सांगितले असले, तरी अजून तशी व्यवस्था जाग्यावर पडलेली नाही. काही विक्रेते सायकल, मोटारसायकलवरून वा छोटय़ा मालवाहू वाहनांतून माशांची विक्री करत असले, तरी त्यांच्यापर्यंत मुबलक प्रमाणात मासे पोहोचत नाहीत. समिती स्थापन केल्यास अशा विक्रेत्यांनाही जेटीवर येऊन मासळी घेणे शक्य होईल याकडे लक्ष वेधले जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच मत्स्योद्योगमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी लक्ष घालून याबाबतीत तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
वेरली, तारले येतात कुठून ?
दरम्यान, गोव्यात परप्रांतांतून मासळी येणेही चालू असून सध्या गोमंतकीय मच्छीमारांना समुद्रात ‘तारले’ व ‘वेरली’ ही मासळी मिळत नाही. असे असताना अनेक ठिकाणी त्यांची विक्री कशी काय चालू आहे, असा सवाल काही मच्छीमारांनी केला. सदर मासळी परप्रांतांतून पोहोचत असून त्यावरही बंदी घालावी, अशी मागणी होऊ लागली आहे.