रुक्मिणीला उपदेश करताना बलरामदादा पुढे म्हणतात-
ज्याचा देहाभिमान बळकट असतो त्याला माया आवरता येत नाही. तो मायेच्या, कल्पनेच्या बंधनात अडकतो. त्यामुळे संसाराच्या बेडीत तो सापडतो आणि त्याची जन्म मरणाची येरझारा थांबत नाही.
आता ऐके वो सुंदरी । परमात्मा अलिप्त चराचरी ।
संयोगवियोगाचि परी । न धरी संसारी सर्वथा ।।
आत्मासंयोगेंविण सहसा । स्वये संसार चाले कैसा ।
विकल्प न धरी वो ऐसा । तेही दशा सांगेन ।।
जैसा रवि अलिप्त आकाशी । दृष्टिरूपाते प्रकाशी ।
तैसा परमात्मा हृषिकेशी ।संसारासी द्योतक ।।
नातरी तैसा खांबसूत्री । अचेतन पुतळय़ा नाचवी यंत्री । एका जैत्य एका हारी । दोही परी अलिप्त ।।
पुतळय़ाचेनि जालेपणे। नाही सूत्रधारिया जन्मणे ।
तयांचेनि निमालेपणे । नाही मरणे सर्वथा ।।
ऐसा अलिप्त कृष्ण प्रसिद्ध । तयासी दंड मुंडण अपराधू । लावितेसी तू नववधू । नव्हे शुद्ध भाव तुझा।।
हे पहा रुक्मिणी! परमात्मा चराचरात व्यापक असला तरी संसारातील संयोग वियोगापासून तो अलिप्त आहे, केवळ साक्षीरूप आहे. आत्मसंयोगाशिवाय संसार चालतो कसा असा प्रश्न तुझ्या मनात उत्पन्न होईल. तर त्याचे उत्तर मी देतो ते आता ऐक. जसा आकाशातील सूर्य सर्व सृष्टी प्रकाशमान करतो. तसा परमात्मा हृषिकेशी सर्व संसाराला ऊर्जा पुरवतो. जसा कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात एक बाहुले जिंकले आणि एक बाहुले हरले तरी दोऱया नाचवणारा सूत्रधार अलिप्तच असतो. नवीन बाहुले जन्माला आले म्हणून सूत्रधाराचा जन्म होत नाही आणि बाहुले मोडून पडले तरी सूत्रधार मरत नाही असा श्रीकृष्ण हा पापपुण्यापासून अलिप्त आहे. रूक्मिणी! तू आपल्या भावाच्या दंडण, मुंडणाबद्दल कृष्णाला दोषी धरलेस तर ते योग्य नाही.
कृष्णा चालक वेगळेपणी। तरी व्यापकता आली हानी । ऐसा न म्हणावे वो रुक्मिणी । तेही कहाणी ऐक पां ।। जैसे गगन आपणावरी। शीत उष्ण- पर्जन्यधारी । परि अलिप्त तिही विकारी। तैसा श्रीहरी कर्मासी ।। गगन सर्वत्र तत्त्वतां । तयासी चिखल लावू जाता । चिखले माखे जो लाविता । गगन सर्वथा अलिप्त ।। तैसेचि जाण कृष्णनाथा । भोग भोगोनि अभोक्ता । कर्म करोनि अकर्ता ।अलिप्तता निजबोधे ।। कृष्णाअंगी जे लाविती कर्म । तोचि त्यासी होय अधर्म । हेचि कोणा न कळे वर्म । कृष्ण निष्कर्म सर्वथा ।।
कृष्ण हा विश्वाचा चालक असून वेगळा आहे असे मानले तर त्याच्या व्यापकत्वाला बाधा येत नाही काय, असा तुझा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर ऐक. जसे गगनात, आकाशात शीत, उष्ण वायू वाहत असतात. आकाशातूनच पाऊस पडत असतो पण या सर्व विकारांपासून आकाश अलिप्तच असते तसा विश्वातील सर्व कर्मांपासून श्रीहरी अलिप्त आहे.